केरळमधील चेनगन्नूर येथे आठ कुंटुंबातील ३० ख्रिश्चन नागरिकांचे रविवारी धर्मांतर करण्यात आल्याचे समोर आले आहे.
अलापुझा – देशात धर्मांतराच्या मुद्यावरुन कलह सुरु असताना विश्व हिंदू परिषदेकडून मात्र ‘घर वापसी’ मोहिम सुरुच आहे. विश्व हिंदू परिषदेकडून आयोजित कार्यक्रमात केरळमधील चेनगन्नूर येथे आठ कुंटुंबातील ३० ख्रिश्चन नागरिकांनी रविवारी धर्मांतर केले. चेप्पाडमधील कनिचनल्लोर येथील देवळात हा सोहळा पार पडला.
ज्या कुटुंबातील नागरिकांचे धर्मांतर करण्यात आले ते या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जबरदस्तीने अथवा आर्थिक मदतीचे आश्वासन देऊन त्यांचे धर्मांतर केले नसल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेचे चेनगन्नू भागाचे अध्यक्ष प्रताप जी. पडिकल यांनी केला आहे.
तसेच या भागातील १५० कुटुंबांना हिंदू धर्मात समाविष्ट व्हायचे आहे. येत्या काही दिवसात राज्यातील अनेक भागांत ‘घर वापसी’ चा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे पड्डीकल म्हणाले.