केरन सेक्टरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांपैकी तीन दहशतवाद्यांना शुक्रवारी भारतीय जवानांनी चकमकीत ठार मारले.
काश्मीर- जम्मू-काश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांपैकी तीन दहशतवाद्यांना शुक्रवारी भारतीय जवानांनी चकमकीत ठार मारले. केरन सेक्टरमधील गुज्जर दुर भागात ही चकमक झाली. सीमेवरून भारतात घुसखोरी करणा-या दहशतवाद्यांविरोधात सैन्याची कारवाई सुरु असून कारवाईचा आजचा अकरावा दिवस आहे.
दहशतवाद्यांच्या एका टोळीने काश्मीरमार्गे केरन सेक्टरमधील सालभाटीगावात २४ सप्टेंबर रोजी प्रवेश केला आहे. त्यांना रोखण्यासाठी अकरा दिवसांपासून कारवाई सुरू आहे. या विभागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांसोबत अधूनमधून चकमकी होत आहेत. मात्र सर्व दहशतवाद्यांना आम्ही शोधून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.
अत्याधुनिक हत्यारे आणि शस्त्रसाठ्यासह दहशतवाद्यांचा भारतात घुसण्याचा कट रचला होता. मात्र भारतीय जवानांनी त्यांना सीमा भागातच रोखले आहे. ३० ते ४० दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे सैन्याच्या १५व्या तुकडीचे लेफ्टनंट जनरल गुरमित सिंग यांनी सांगितले. यातील १० ते १२ जणांना २६ सप्टेंबरला ठार मारण्यात आले असून उर्वरीत दहशतवाद्यांचा कसून शोध सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
[EPSB]
केरनमध्ये कारगिलसारखी स्थिती नाही »
जम्मू-काश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये कारगिलसारखी परिस्थिती नसल्याचे लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग यांनी शुक्रवारी सांगितले.
[/EPSB]