लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही शनिवारी केडीएमसीत स्थायी समितीची सभा पार पडली.
कल्याण- लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही शनिवारी केडीएमसीत स्थायी समितीची सभा पार पडली. या सभेत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी सुमारे नऊ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. स्थायी समितीने आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप मनसेच्या सदस्यांनी केला. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा मनसेचे नगरसेवक राहुल चितळे यांनी दिला.
त्यामुळे स्थायी समितीची सभा वादाच्या भोव-यात सापडण्याची शक्यता आहे. पावसाळयापूर्वी रस्त्यावरील चरी बुजवण्यासाठी व खडीकरण-डांबरीकरण करण्यासाठी प्रशासनाकडून सुमारे नऊ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव शनिवारच्या स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. यावर मनसेचे नगरसेवक राहुल चितळे यांनी निवडणुकीची आचारसंहिता असताना सभेचे आयोजन कसे काय करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला. मतदारांवर प्रभाव पडू शकतो, अशी कोणतीही कामे करू नयेत, असे निवडणूक आयोगाच्या नियमात असताना, सभा लावण्यात आल्याने मनसेचा विरोध असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
पालिका सचिव सुभाष भुजबळ यांनी, दैनंदिन देखभाल-दुरुस्तीची कामे करताना निवडणूक आयोगाची परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचे आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांत असल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र मनसेच्या चारही सदस्यांनी विरोध कायमच ठेवला. अखेर सभापती प्रकाश पेणकर यांनी मनसेच्या सदस्यांचा विरोध नोंदवून घेत विषय मंजूर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या कामांना मंजुरी देण्यात आली. मनसेने सभेला विरोध दर्शवल्यानंतरही मनसेचे सदस्य सभेत बसून होते. त्यामुळे मनसे निवडणूक आयोगाकडे कधी तक्रार करणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे. प्रशासनाच्या वतीने आयत्या वेळी ‘बायो-मेडिकल वेस्ट ट्रिटमेंट अँड डिस्पोजल प्लँट’ आधुनिक यंत्रसामग्रीसह देखभाल दुरुस्ती करून चालवण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला होता. त्यावर कोणतीही चर्चा न होता हा विषय मंजूर करण्यात आला.