दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कायदामंत्री सोमनाथ भारती यांची निवडणूक रद्द करण्यात यावी या मागणीसाठी दाखल झालेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने दोन्ही मंत्र्यांना नोटीस बजावली आहे.
नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कायदामंत्री सोमनाथ भारती यांची निवडणूक रद्द करण्यात यावी या मागणीसाठी दाखल झालेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने दोन्ही मंत्र्यांना नोटीस बजावली आहे.
भाजप नेते विजेंदर गुप्ता आणि आरती मेहरा यांनी ही याचिका दाखल केली असून, त्यांनी केजरीवाल आणि भारती यांच्यावर निवडणूक खर्चाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाची मर्यादा १४ लाखापर्यंत निश्चित केली होती. मात्र केजरीवाल आणि भारती यांनी त्यापेक्षा जास्त खर्च केल्याने त्यांची निवडणूक रद्द करण्यात यावी अशी मागणी गुप्ता आणि मेहरा यांनी केली आहे.
गुप्तांच्या याचिकेवर न्यायमूर्ती विपिन सांघी यांनी केजरीवालांना नोटीस बजावली तर, मेहरांच्या याचिकेवर न्यायमूर्ती जी.एस.सिस्तानी यांनी भारतींना नोटीस बजावली. दोघांना उत्तर देण्यासाठी २५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीत आम आदमी पक्षाच्या या दोन नेत्यांनी १७ लाखापेक्षा अधिक खर्च केला त्यामुळे त्यांची निवडणूक रद्द करा अशी मागणी याचिकेत केली आहे.