मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलाव क्षेत्रांत सध्या चांगला पाऊस पडत असतानाही कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन विविध परवानग्या मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.
मुंबई- मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलाव क्षेत्रांत सध्या चांगला पाऊस पडत असतानाही कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन विविध परवानग्या मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. त्यामुळे या सर्व परवानग्या मिळाल्यानंतर, तेव्हाचा तलावातील उपयुक्त साठा आणि पडणारा पाऊस याचा अंदाज घेऊनच आवश्यकता असेल तर कृत्रिम पाऊस पाडू, अशी स्पष्ट भूमिका बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने जाहीर केली. त्यामुळे प्रशासनाची द्विधा मनस्थिती उघड झाली आहे.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) यांच्या देखरेखीखाली भारतीय हवामान शास्त्र विभाग आणि इस्रयल सरकारच्या अखत्यारितील मेकोरेट कंपनी यांच्या मदतीने महापालिका कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार आहे. आयआयटीएम आणि मेकोरेट कंपनीच्या प्रतिनिधींनी 16 ऑगस्ट रोजी महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्व गटनेत्यांसमोर सादरीकरण करून सप्टेंबर महिन्यात प्रयोग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याच वेळी मेकोरेट कंपनीने आपले विमान देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे हे विमान आणि त्यासाठीचा पायलट हा दक्षिण आफ्रिकेतील कंपनीच्या मदतीने घेण्याचे निश्चित झाले. त्यामुळे या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 12 कोटी रुपयांवरून 20 कोटींवर पोहोचला होता. यासाठी ओझर विमानतळावर नियंत्रण कक्ष तसेच तेथून विमान उड्डाण घेणार असल्यामुळे केंद्रीय गृहविभाग, नागरी हवाई उड्डाण विभाग यांची परवानगी आवश्यक आहे. सध्या तलाव क्षेत्रांमध्ये समाधानकारक पाऊस पडत असला तरी कृत्रिम पावसासाठी परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सर्व परवानग्या मिळाल्यानंतर कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय तेव्हाच्या भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून घेतला जाणार आहे.
मात्र, विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी कृत्रिम पावसाला विरोध केला असून, जर प्रशासन कृत्रिम पाऊस पाडण्याच्या निर्णयावर ठाम असेल तर कर्नाटक आणि अमेरिकन कंपन्या ज्यांच्याकडे स्वत:ची विमाने आहेत, त्यांच्याकडून हा प्रयोग करून घ्यावा. या कंपन्या केवळ नऊ कोटी रुपयांमध्ये काम करायला पुढे आल्या आहेत. यामुळे आता 20 कोटी रुपये खर्च केले जातात, त्या तुलनेत अध्रे पैसे खर्च होतील व बचत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावर मनसेचे संदीप देशपांडे यांनी, कृत्रिम पावसाऐवजी रेन वॉटर हार्वेस्टिंग, विहीर, कुपनलिका यांसारख्या पर्यायी व्यवस्थेसाठी हा पैसा खर्च करावा, अशी मागणी केली.
तलावांमध्ये 95 हजार कोटी लिटरचा साठा
वैतरणा नदीच्या पात्रात सध्या 289 दिवस आणि भातसा नदीच्या पात्रात 314 दिवस पुरेल इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. मुंबईकरांना वर्षभर एक लाख 25 हजार कोटी लिटर पाण्याची आवश्यक असते. त्या तुलनेत मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा या तलावांच्या पात्रात 95 हजार 756 कोटी लिटर एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. मागील तीन दिवसांपासून सलग चांगला पाऊस पडत असून, अशाचप्रकारे पावसाने जोर कायम ठेवल्यास पाण्याच्या पातळी वाढून मुंबईकरांची वर्षाची तहान भागवण्यापुरता आवश्यक तो साठा जमा होईल, असा विश्वास जलखात्याच्या अधिका-यांनी व्यक्त केला आहे.