शाळेला सुट्टी लागली आणि तिचा आनंद घेता घेता एक महिना कसा संपला, हे तुम्हाला कळालंसुद्धा नसेल. हो ना? या सुट्टीत तुम्ही अनेक प्रकारे धम्माल-मस्ती केली असेल, त्यात काही शंकाच नाही. कोणी क्रिकेट, बुद्धिबळ या खेळांचं प्रशिक्षण घेतलं असेल तर कोणी गावाला जाऊन आंबे आणि फणसावर ताव मारला असेल. ही सगळी मज्जा करून झाल्यानंतर आता राहिलेल्या दिवसांत काय करायचं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पुस्तकाचा असा एक खजिना सध्या बाजारात आला आहे. ज्याचं वाचन करून तुम्ही राहिलेली सुट्टी मज्जेत घालवू शकता.
बालसाहित्याची पुस्तकं म्हटली की, आपल्या डोळ्यांसमोर येतात, ती पारंपरिक पद्धतीच्या ससा नि कासवच्या गोष्टी असलेली पुस्तकं ! पण त्याच त्याच प्राणी-पक्ष्यांच्या गोष्टी वाचून तुम्हालाही कंटाळा आला असेल ना? पण आजच्या काळातल्या मुलांना या प्रकारच्या कथा वाचायला येणारा कंटाळा लक्षात घेऊन ‘व्यास क्रिएशन’ या प्रकाशन संस्थेने नव्या पिढीतील मुलांसाठी बालपुस्तकांचा नवीन खजिना खुला केला आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने लहान मुलांच्या मनात कुतूहल निर्माण करणा-या विषयांची सविस्तर माहिती या पुस्तकांतून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केवळ बालकथा न देता चित्रपट, इंटरनेट, खगोलशास्त्र, किल्ले, राजे-महाराजे, बायोगॅस, निसर्गसंगोपन यांसारख्या विषयांची सविस्तर माहिती तुम्हाला समजेल.
या पुस्तकांमध्ये वापरलेली भाषा तुम्हाला अगदी आपलीशी वाटेल अशी आहे. तर गोष्टीच्या विषयाला साजेशा चित्रांचाही समावेश या पुस्तकांमध्ये करण्यात आला आहे. यामुळे ही पुस्तकं वाचताना तुम्हाला नक्कीच मज्जा येईल. गंमत म्हणजे, या पुस्तकाच्या मलपृष्ठावर दिलेल्या कवितासुद्धा अतिशय वाचनीय आहेत. दोस्तहो, काय मग, या गोष्टींच्या दुनियेत रंगून जायला तुम्ही कधी तयार होताय?