दीड वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव झाला. राणे यांच्या पराभवाने अवघ्या कोकणचेच नुकसान झाले आहे.
कुडाळ- दीड वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव झाला. राणे यांच्या पराभवाने अवघ्या कोकणचेच नुकसान झाले आहे. यामुळेच कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या हाती नगरपंचायत सोपवण्याचा निर्धार कुडाळवासीय जनतेने केल्याची चर्चा आहे.
कुडाळ शहर नारायण राणे यांच्याच पाठीशी असल्याचे निवडणूक निकालात दिसून येईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. राणे यांच्या पराभवाची भरपाई नगरपंचायत निवडणुकीच्या विजयाने सुरू करावी, असा चंग कुडाळवासीयांनी बांधला आहे.
कुडाळ नगरपंचायत निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली असताना शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात भाजपा-शिवसेनेची युती असतानाही कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत सेना-भाजपा आमने-सामने निवडणूक रिंगणात आहे. सोशल मीडियावर भाजपाच्या गोबेल्स नीतीचे वस्त्रहरण मित्रपक्ष शिवसेनेकडून करण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा कुडाळ-मालवण विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपा-शिवसेनेच्या खोटय़ा आश्वासनांमुळे पराभव केला. नारायण राणे यांचा झालेला पराभव कोकणवासीयांच्या जिव्हारी लागला, तसा तो मालवण-कुडाळ मतदारसंघातील जनतेच्याही लागला आहे. गेल्या वर्षभरात कोकणातील विकासकामात होणा-या अन्यायातून जनतेच्या हे निदर्शनास आले आहे.
यामुळेच कुडाळ नगरपंचायत ‘दादांच्या’ हाती द्यावी, अशी मानसिकता आहे. प्रशासन आणि सत्ताधा-यांवर नारायण राणेंचीच हुकूमत चालते, नारायण राणे यांचाच करिष्मा चालतो, हे डंपर वाहतूकदारांच्या आंदोलनातून दिसून आले आहे. कुडाळ मालवण मतदारसंघातच विकास प्रक्रिया ठप्प झाली आहे, हे जनतेसमोर आल्याने कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत ‘ती’ चूक होऊ द्यायची नाही, असा निर्धारच कुडाळवासीयांनी व्यक्त केला आहे.