जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात दुस-या दिवशीही संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.
जम्मू – जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात दुस-या दिवशीही संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. किश्तवाडमध्ये शुक्रवारी ईदच्या नमाज पठणानंतर दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाले होते.
जिल्ह्यात लष्कराच्या तैनातीनंतर परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे मात्र तणाव अजूनही कायम आहे असे जम्मू प्रदेशचे विभागीय आयुक्त शांतमानू यांनी सांगितले. किश्तवाडमध्ये शुक्रवारी नमाज पठणानंतर एक गटाने राष्ट्रविरोधी घोषणा सुरु केल्या. त्यावेळी तेथे असणा-या दुस-या गटाने त्याला विरोध केला. यानंतर दोन्ही गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लष्कराची मदत मागितल्याने येथे लष्कराने पाचारण केले आहे. शनिवार सकाळपासून जिल्ह्यात कुठेही हिंसाचाराची घटना घडलेली नाही. मात्र काही भागात बंद पाळण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीर सरकारने किश्तवाडमध्ये झालेल्या या जातीय हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेला जबाबदार असणा-यांना मोकळे फिरु देणार नाही असे राज्याचे जलसिंचन मंत्री शामलाल शर्मा यांनी सांगितले.