महाराष्ट्र वसुंधरेचा पहिला छत्रपती जिथे सिंहासनाधिष्ठित झाले ते पवित्र मंगलस्थळ म्हणजे राजधानी रायगड. रायगडास भेट देण्यासाठी प्रथम रायगड जिल्ह्यातील महाड गाव गाठावे.
महाराष्ट्र वसुंधरेचा पहिला छत्रपती जिथे सिंहासनाधिष्ठित झाले ते पवित्र मंगलस्थळ म्हणजे राजधानी रायगड. रायगडास भेट देण्यासाठी प्रथम रायगड जिल्ह्यातील महाड गाव गाठावे. महाडच्या एस.टी. स्थानकाहून रायगडासाठी बससेवा आहे. दुर्गमित्रांनी थेट रायगडाच्या पायथ्याशी न उतरता प्रथम पाचाड गावातील पाचाड कोटातील राजमाता जिजाऊंच्या समाधीस्थळाचं दर्शन घ्यावे. पाचाड कोटापासून अर्धा तासातच रायगडाच्या चीतदरवाजापर्यंत पायी पोहोचता येते.
रायगडावर जाण्यासाठी सध्या रोपवेची सोय आहे. पण दुर्गसंरक्षणव्यवस्था, रायगडाची दुर्गमता, शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली प्रत्येक चिरा पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी दुर्गयात्री रायगडास पायऱ्यांच्या वाटेने गढ चढून जातात. संपूर्ण रायगड पाहण्यासाठी किमान दोन दिवस हवेतच.
रायगडाच्या दुर्गअवशेषांत चितदरवाजा, खूब लढा बुरूज, महाद्वार, वीरगळ, मदारशाची कबर, लोहस्तंभ, हत्तीतलाव, गंगासागर तलाव, पालखी दरवाजा, राणीवशा अवशेष, स्वयंपाकगृह, टाकसाळ, शिवछत्रपतींचा राहाता वाडा, राजसभा, नगारखाना, शरभशिल्पे, सिंहासनाची जागा, सदर शिर्काई मंदिर, हत्तीखाना, हुजूरबाजार, जगदीश्वर मंदिर, कोळीम तलाव, दोन शिलालेख, शिवछत्रपतींची समाधी, भवानी मंदिर, महादेव मंदिर, कुशावर्त तलाव, वाघ दरवाजा, टकमक टोक, धान्यकोठार, दारूकोठार, हिरकणी बुरूज, होळीचा माळ इ. अशा कितीतरी वैशिष्टय़पूर्ण वास्तूंचा समावेश आहे. पावसाळ्यात याच्या कडय़ावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. गडावरील शिकाई देवी मंदिर छोटेखानी स्वरूपाचे असले तरी मुख्य दैवत म्हणून प्रसिद्ध आहे.
‘रायगडाची जीवनगाथा’ या पुस्तकातील ऐतिहासिक संदर्भ नोंदीत शिर्काई देवीचे उत्सव शिवकालीन, पेशवेकालीन कालखंडातील मंदिराची व्यवस्था, देवीचे नवस, गोंधळ, बळीप्रथा इत्यादींबाबत संदर्भ दिलेले आहेत. पाचाड गावातील ग्रामस्थांमधील अनेक कुटुंबे यास कुलस्वामीनी मानतात. शिवकालीन संदर्भ जपणारी व अडचणींना धावून येणा-या आई शिर्काईचे जनमानसात आराध्य दैवत म्हणून स्थान आहे. ऐतिहासिक कालखंडातील दिवाबत्ती व खर्चाचा तपशील उपलब्ध आहे.
मार्च १७७२मध्ये रायगड पेशव्यांच्या ताब्यात आला. पेशव्यांनी शिवरायांच्या सिंहासनाची व्यवस्था लावून दिली. शिर्काई व्याडेवर देवी भवानी यांचे उत्सव पेशवे कालखंडात पुनश्च सुरू करण्यात आले. रायगडाची मूळ निर्मिती सातवाहनकाळात झाल्याचे संदर्भ मिळतात. रायगडाच्या डोंगरास तणस, नंदादीप, रायरी, अशी नामावली होती. सन १४३६ मध्ये हा किल्ला बहामनी सुलतान, निजामशाही, आदिलशाही अशा क्रमाने राजवटींच्या अमलाखाली स्थलांतरित होत राहिला. शिवरायांनी सन १६५६ मध्ये रायगड स्वराज्यात आणला व हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखीखाली गडावरील जुनी बांधकामे पाडून राजधानीस उपयुक्त असणा-या नव्या वास्तू उभारल्या.
१६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावर झाला व पुढे ३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांचा मृत्यू रायगडावरच झाला. संभाजी राजांच्या निधनानंतर सन १६८९ मध्ये मोगलांनी रायगडाचा ताबा घेतला. परत सन १७३३ मध्ये मराठय़ांनी रायगड काबीज केला आणि सन १८१८ मध्ये ब्रिटिशांनी रायगडावर पोटल्याच्या डोंगरांवरून तोफांचा भडिमार करून रायगडाचा ताबा घेतला.