आंध्रप्रदेशचे काळजीवाहू मुख्यमंत्री एन.किरणकुमार रेड्डी यांनी रविवारी त्यांच्याशी एकनिष्ठ असलेले मंत्री आणि काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या सहा खासदारांची बैठक घेतली.
हैदराबाद – आंध्रप्रदेशचे काळजीवाहू मुख्यमंत्री एन.किरणकुमार रेड्डी यांनी रविवारी त्यांच्याशी एकनिष्ठ असलेले मंत्री आणि काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या सहा खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत भविष्यातील रणनितीसंदर्भात चर्चा झाली. किरणकुमार रेड्डी आपल्या समर्थकांसह सीमांध्रमध्ये नव्या पक्षाची स्थापना करु शकतात.
केंद्र सरकारने आंध्रप्रदेशचे विभाजन करुन, स्वतंत्र तेलंगण राज्याच्य़ा निर्मितीला मान्यता देणारे विधेयक मंजूर केल्यानंतर किरणकुमार रेड्डी यांनी गेल्या आठवडयात मुख्यमंत्रीपदाचा आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
एल.राजगोपाल, सब्बम गरी, व्ही.अरुणकुमार, साई प्रताप, हर्षा कुमार आणि आर.संबासिवा हे खासदार या बैठकीला उपस्थित होते. या सहा खासदारांनी लोकसभेत संपुआ सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला म्हणून पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेऊन त्यांना काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आले.
किरणकुमार रेड्डी यांच्याशी एकनिष्ठ असलेले एस.सैलजनथ, पी.सत्यनारायण, पार्थसारथी हे मंत्रीही या बैठकीला उपस्थित होते. आंध्रप्रदेशचे राज्यपाल ईएसएल नरसिंम्हन यांनी किरणकुमार रेड्डी यांचा राजीनामा स्वीकारला असून, सध्या त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितले आहे.
आंध्रप्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करायची कि, नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करायची याचा निर्णय अद्याप काँग्रेसने घेतलेला नाही. तेलंगण राज्याच्या निर्मिती प्रक्रियेसंदर्भात येत्या एक ते दोन दिवसात केंद्र सरकारकडून अधिसूचना निघण्याची शक्यता आहे.