जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन तीन दिवस झाल्यानंतरही अद्याप राज्यातील सरकार स्थापनेचा पेच सुटलेला नाही.
श्रीनगर- जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन तीन दिवस झाल्यानंतरही अद्याप राज्यातील सरकार स्थापनेचा पेच सुटलेला नाही. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने सर्वाधिक २८ जागांवर विजय मिळवला असला तरी त्यांनी अद्याप कोणाला सोबत घ्यायचे याचा निर्णय घेतला नाही. तर भाजपने सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले असले तरी सरकार स्थापन कसे करणार याचे ठोस उत्तर त्यांच्याकडे देखील नाही.
या सत्तेच्या राजकारणात विधानसभेच्या ८७ जागांपैकी केवळ तीन जागांवर निवडूण आलेल्या अपक्ष उमेदवारांचा भाव वाढला आहे. या अपक्ष आमदारांनी कोणत्याही परिस्थीतीत भापला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट करत पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स यांनी एकत्र यावे आणि सरकार स्थापन करावे असा प्रस्ताव ठेवला आहे.
विधानसभेत पीडीपीच्या २८ तर नॅशनल कॉन्फरन्सच्या १५ जागा आहेत. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास संख्याबळ ४३ होते. सरकार स्थापन करण्यासाठी ४४ आमदारांची गरज आहे. अशा परिस्थितीत अपक्ष आमदार अब्दुल रशीद शेख यांनी सरकारला पाठिंबा देऊ असे म्हटले आहे.
सरकार स्थापन करण्यासाठी पीडीपीकडे जर पुरेसे संख्याबळ नसले तर त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सचा पाठिंबा का घेऊ नये? असा सवाल शेख यांनी विचारला आहे. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून हे दोन्ही पक्ष स्वबळावर सरकार स्थापन करण्याची भाष करत आहेत. मात्र त्यांना अद्याप स्वबळावर सरकार स्थापन करता आले नसल्याचे ते म्हणाले.
नॅशनल कॉन्फरन्सच्या ओमर अब्दुल्ला यांनी पीडीपीला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र यावर पीडीपीने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.