रेल्वेच्या वरच्या वर्गातून प्रवास करणा-या प्रवाशांसाठी ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले होते. आता ते शयनयानातून प्रवास करणा-या प्रवाशांनाही सक्तीचे करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सामान्यत: लोकांना हा नियम जाचक वाटण्याची शक्यता आहे.रेल्वेच्या तिकिटातला काळाबाजार रोखण्यासाठी ते आवश्यक आहे.
रेल्वेच्या वरच्या वर्गातून प्रवास करणा-या प्रवाशांसाठी ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले होते. आता ते शयनयानातून प्रवास करणा-या प्रवाशांनाही सक्तीचे करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सामान्यत: लोकांना हा नियम जाचक वाटण्याची शक्यता आहे; पण नित्य रेल्वेने प्रवास करणा-यांना या निर्णयाचे महत्त्व कळेल. रेल्वेच्या तिकिटातला काळाबाजार रोखण्यासाठी ते आवश्यक आहे. रेल्वेच्या आरक्षणात आधुनिकीकरण आणि संगणकीकरण करण्यासाठी प्रशासनाने जी पावले उचलली आहेत, त्यातून काळाबाजार सुरू झाला आहे. तो रोखण्यासाठी प्रशासनाला पावले उचलावी लागत आहेत. आरक्षणाचे संगणकीकरण करण्यात आले आहे. देशभरातली ही सोय आता नेटवर्किंगने जोडलेली आहे. या संगणकामुळे आरक्षणाच्या कामातला कर्मचा-यांचा भ्रष्टाचार संपला आहे. सरकारी कामातला भ्रष्टाचार संपवण्यासाठी संगणकीकरण कसे उपयोगी पडते, याचे हे एक चांगले उदाहरण आहे. त्यामुळे आरक्षणाच्या खिडकीवर होणारा भ्रष्टाचार आणि अडवणूक संपली असली तरी याच आधुनिकीकरणाचा गरफायदा घ्यायला काही लोकांनी सुरुवात केली आहे. रेल्वेने तत्काल सेवा सुरू केली. या सेवेतली तिकिटे काढण्यासाठी सकाळी म्हणजे पहाटे सहा वाजताच एजंटांची रांग लागते. त्यामुळे सामान्य प्रवाशांना तिकिटे बुक करण्याचा फॉर्म मिळणेही अशक्य होते. अर्थात तत्काळ बुकिंग करणारे एजंट ज्याला प्रवास करायचा असेल त्याचेही कमिशन घेऊन बुकिंग करतात. कारण या प्रकारात ओळखपत्र दाखवल्याखेरीज प्रवासच करता येत नाही. पण काही लोकांनी आपल्या घरीच इंटरनेटवर बुकिंग करता येते, याचा गरफायदा घेऊन मन मानेल तेव्हा बुकिंग करायला सुरुवात केली. ती तिकिटे नंतर जादा पैसे घेऊन विकायला सुरुवात केली. हा प्रकार अगदी सिनेमा तिकिटाच्या काळ्या बाजारासारखाच झाला. पण हा आधुनिकीकरणाचा वाईट परिणाम आहे. असा काळाबाजार होतो म्हणून ही पद्धत बंद करून चालत नाही. तिच्यावर उपाय शोधला पाहिजे. आता तर काळा बाजार करणा-यांनी सगळ्याच वर्गाची अशी तिकिटे बुक करून विकायला सुरुवात केली आहे. ही तिकिटे काढणा-या एजंटला ती कोणाला विकली जाणार आहेत, हे माहीत नसते. एका नावाने तिकीट काढून त्यावर दुसराच कोणीतरी प्रवास करीत असतो. आता स्लीपर क्लासलाही ओळखपत्र सक्तीचे केले जाणार आहे. तसे केल्याने काळ्या बाजारातले तिकीट घेऊन प्रवास करणा-यांना सावध राहावे लागेल. तिकीट एका नावाचे आणि प्रवास करणारा दुसराच कोणीतरी हा प्रकार आता बंद होईल. कारण अशी तिकिटे घेऊन प्रवास करणा-या प्रवाशाला ओळखपत्र दाखवता आले नाही, तर त्याचा तो प्रवास विनातिकीट समजला जाणार आहे. या उपायाने तिकिटातला काळाबाजार संपण्यास नक्कीच मदत होणार आहे. खरे तर लोकांनी आपले तिकीट स्वत:च आपले नाव टाकून आपल्या घरीच इंटरनेटवर बुक केले पाहिजे. ही गोष्ट काही फारशी अवघड राहिलेली नाही. घराघरात इंटरनेट आहेत. अनेकांचे व्यवहार आता इंटरनेट बँकिंगने होत आहेत. तेव्हा स्वत:चे तिकीट स्वत:च काढणे हा या क्षेत्रातला काळाबाजार संपुष्टात आणण्याचा एक प्रभावी उपाय आहे.