मुंबई महानगर परिसरातील कारागृहांच्या अद्ययावतीकरणाला सुरुवात झाली आहे.
मुंबई – मुंबई महानगर परिसरातील कारागृहांच्या अद्ययावतीकरणाला सुरुवात झाली आहे. याअंतर्गत तळोजा, आर्थर रोड, ठाणे आदी कारागृहांत सीसीटीव्ही व मोबाईल नेटवर्क जॅमर्स बसवण्यात येत आहेत. याशिवाय कारागृहांतील कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई परिसरात नवे कारागृह उभारण्याच्या हालचालींनाही वेग आला आहे. यासाठी मुंबईतील मानखुर्द परिसरात जागेची पाहणी करण्यात आली असून, याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
कारागृहाच्या अद्ययावतीकरणासाठी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात नुकतेच ७२ नवे सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. आणखी २० सीसीटीव्ही लवकरच आर्थर रोड कारागृहात बसवण्यात येणार आहेत. देशातील संवेदनशील कारागृहांपैकी एक असलेल्या आर्थर रोड कारागृहात गेल्या महिन्यात एका कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याशिवाय महिनाभरापूर्वीच एका कैद्याला सीमकार्ड घेऊन जात असताना पकडण्यात आले होते. अशा विविध घटना लक्षात घेता आर्थर रोड कारागृहात २० जॅमर्सही बसवण्यात आले आहेत. याशिवाय नवी मुंबईतील तळोजा कारागृहातही ७४ सीसीटीव्ही व २० जॅमर्स बसवण्यात आले आहेत. ठाणे कारागृहातही २० मोबाईल जॅमर्स बसवण्यात आले आहेत.
मुंबई व परिसरातील कारागृहांची स्थिती लक्षात घेता, क्षमतेपेक्षा कैद्यांची संख्या फार जास्त आहे. आर्थर रोड कारागृहात प्रत्यक्ष ८०४ कैद्यांची क्षमता असताना येथे २ हजार ४८९ कैदी आहेत. हीच अवस्था ठाणे व कल्याण कारागृहाचीही आहे. ठाणे कारागृहात १ हजार ८०५ कैदी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र सध्या येथे २ हजार ७३३ कैदी आहेत. कल्याणमध्येही ५०५ कैद्यांची क्षमता असताना १ हजार २३५ कैदी आहेत. एकटय़ा तळोजा कारागृहात क्षमतेपेक्षा कमी कैदी सध्या ठेवण्यात आले आहेत. यात २ हजार १२४ क्षमता असताना केवळ १४८ कैदी बंद आहेत. मात्र भविष्यात मुंबईत आणखी एक कारागृहाची गरज आहे. त्यामुळे कारागृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच नव्या कारागृहासाठीच्या हालचालींना सुरुवात केली आहे. मानखुर्दमध्ये कदाचित हे कारागृह असेल. या वृत्ताला एका वरिष्ठ अधिका-याने दुजोरा दिला आहे.