घाटकोपर परिसरात रोज मोलमजुरीसाठी नाक्या-नाक्यांवरील कामगारांना येथील स्थानिक कंत्राटदार आणि गुत्तेदारांच्या मुजोरीपणामुळे मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मुंबई- कामगार मंत्री प्रकाश मेहता यांचा मतदारसंघ असलेल्या घाटकोपर परिसरात रोज मोलमजुरीसाठी नाक्या-नाक्यांवरील कामगारांना येथील स्थानिक कंत्राटदार आणि गुत्तेदारांच्या मुजोरीपणामुळे मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मागील वर्षभरात हे प्रकार वाढले असून दिवभरासाठी ठरलेली मजुरीही वेळेत दिली जात नाही. अनेकदा एक काम सांगून दुसरेच काम दिले जाते. तर वेळेसाठीही कधी दोन-दोन तास अधिकचे काम करून घेण्यासाठी कंत्राटदारांकडून दमदाटी केली जात असल्याच्या संतप्त भावना राजावाडी नाक्यावरील बांधकाम व नाका कामगारांकडून व्यक्त करण्यात आल्या. रोज एका कंत्राटदाराकडे काम करावे लागत असल्याने कोणाविरोधात तक्रार करावी असा प्रश्न आमच्यासमारे असतो, असेही कामगारांकडून सांगण्यात आले.
बंजारा नाका कामगार संघटनेच्या जनजागृती अभियानादरम्यान मंगळवारी कामगारांनी ही व्यथा संघटनेचे प्रमुख अॅड. नरेश राठोड यांच्यासमोर मांडली. सरकारकडून नोंदणीची ठेवण्यात आलेली अट जाचक ठरत असल्याने आणि त्यासाठीची माहिती बांधकाम व्यावसायिकांकडून दडपून टाकण्यात येत असल्याने कोठेही नाका कामगारांची नोंद होत नसल्याची प्रतिक्रिया यावेळी साहेबराव खरेवाड, संभाजी आंबेकर, अंकुश जाधव, संभाजी आंबेकर या नाका कामगारांनी दिली. तर अनेकदा मागील वर्षभरापासून काही गुत्तेदार आपल्याला ठरलेली मजुरीही देत नाहीत. अनेकदा दमदाटी करून ती कमी देत असल्याची प्रतिक्रिया नाका कामगारांकडून देण्यात आल्या.
राजावाडी नाक्यावर रोज सुमारे दोन हजारांच्या दरम्यान नाका, बांधकाम कामगार मोलमजुरीसाठी येऊन उभे राहतात. मात्र यातील एकाही कामगाराची नोंदणी न झाल्याची व्यथा अंकुश जाधव यांनी अॅड. नरेश राठोड यांच्यासमोर मांडली. असंघटित क्षेत्रातील बांधकाम आणि नाका कामगारांच्या नोंदणीसाठी कायद्यात तरतूद असतानाही कामगारमंत्र्यांच्या विधानसभा क्षेत्रात एकही बिल्डर आणि कंत्राटदार नाका आणि बांधकाम कामगारांची नोंदणीच ठेवत नसल्याचे यावेळी कामगारांकडून सांगण्यात आले.
सर्वोदय नाक्यावर लोडिंग-अनलोडिंगचे कामगार मागील पन्नास वर्षापासून काम करत असल्याची त्यांचीही दखल आत्तापर्यंत सरकार दरबारी घेण्यात आली नसल्याची व्यथा मोहन बोरकर यांनी मांडली. पुणे, नगर, नाशिक आदी अनेक जिल्ह्यातील हे कामगार सर्वोदय नाक्यांवर असून याठिकाणी नोंदणीची मागणी करूनही कोणी दखल घेत नसल्याचे अनेक कामगारांकडून सांगण्यात आले. बंजारा नाका कामगार संघटनेकडून १ डिसेंबरपासून राज्यात असंघटित क्षेत्रातील बांधकाम, नाका कामगारांसाठी राज्यव्यापी जनजागृती अभियान राबण्यात येत असून त्याचा समारोप ३ जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानात होणार आहे.