पावसाच्या अभावी कांद्याच्या पिकावर परिणाम झाला असून गेल्या महिनाभरात कांद्याच्या किमतीत ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
नवी दिल्ली- पावसाच्या अभावी कांद्याच्या पिकावर परिणाम झाला असून गेल्या महिनाभरात कांद्याच्या किमतीत ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे कांदा पुन्हा एकदा सर्वसामान्यांना रडवू लागला आहे.
लासलगाव बाजारपेठेत घाऊक कांद्याचा दर २५ रुपये किलोवर पोहोचला असून दिल्लीतील कांद्याचा किरकोळ भाव ३५ ते ४० रुपये झाला आहे. लासलगावहून देशभरात कांदा पाठवला जातो. गेल्या आठवडय़ात घाऊक कांद्याच्या किमती १५ रुपये किलो होत्या. मात्र, पाऊस न पडल्याने चांगल्या दर्जाच्या कांद्याचे पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे घाऊक व किरकोळ बाजारात कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यात रोखण्यासाठी किमान निर्यात मूल्य प्रति टन ४२५ डॉलर केले आहे. तसेच कांद्याची साठेबाजी करण्यास निर्बंध घातले आहेत. तसेच कांद्याची आयात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी तज्ज्ञांच्या मते, कांदा साठवणुकीची पुरेशी व्यवस्था नसल्याने तो फुकट जात आहे. त्यामुळे किमती वाढल्या आहेत. सप्टेंबरच्या मध्यावर नवीन कांद्याचे पीक येईपर्यंत ही परिस्थिती कायम राहील.