कांद्याला अवकाळी पावसाचा फटका बसलेला असतानाच; सोमवारी लासलगावमध्ये कांद्याचा भाव कोसळला.
मनमाड- कांद्याला अवकाळी पावसाचा फटका बसलेला असतानाच; सोमवारी लासलगावमध्ये कांद्याचा भाव कोसळला. परिणामी संतप्त झालेल्या शेतक-यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला आणि नाशिक-येवला रस्त्यावर आंदोलन केले.
कांद्याचे निर्यातमूल्य कमी न केल्याने नाशिकच्या कांदा निर्यातदारांनी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे स्थानिक बाजारात शेतक-यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे.
सरकारने कांद्यावर ७०० डॉलरचे निर्यातमूल्य लावले आहे. यामुळे कांद्याची निर्यात ठप्प झाली आहे. याचा फटका कांदा निर्यातदारांना बसत आहे. हे निर्यातमूल्य कमी करण्याची मागणी कांदा निर्यातदारांनी केली होती, मात्र यावर सरकारने काहीही निर्णय घेतलेला नाही. यापुढेही कांदा निर्यातदार लिलावात सहभागी झाले नाहीत तर कांद्याचे भाव आणखी घसरण्याची शक्यता आहे.