कांद्याचा भाव सातत्याने कोसळत आहे. सध्या कांद्याला किमान ३०० व सरासरी ७०० रुपये क्विंटल भाव मिळाल्याने बाजारात कांदा सात रुपयांनी मिळू लागला आहे.
पुणे – कांद्याचा भाव सातत्याने कोसळत आहे. सध्या कांद्याला किमान ३०० व सरासरी ७०० रुपये क्विंटल भाव मिळाल्याने बाजारात कांदा सात रुपयांनी मिळू लागला आहे. तर दुसरीकडे मेथीच्या भाजीलाही एक रुपयाला जुडी अशा कवडीमोल भावात विकावे लागत असल्याने शेतक-यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांत कांद्यासह अन्य शेती मालाला कवडीमोल भाव मिळत आहे. मार्च ते एप्रिलपर्यंत जिल्ह्यात कांद्याची आवक होत राहणार आहे. या कांद्याची टिकवण क्षमता कमी असते. त्यात गुजरातसह अन्य राज्यांतील उन्हाळी कांदा बाजारात दाखल झाला आहे. तसेच त्या-त्या राज्यातील स्थानिक बाजारपेठेत तेथील कांदा आला असल्याने नाशिकच्या आणि पुण्याच्या कांद्याला मागणी कमी आहे. त्यामुळे बाजारभावातील ही घसरण अशीच सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
विहिरींत पाणी असलेल्या शेतक-यांनी शेतात भाजीपाला घेतला असून; सध्या बाजारभाव कोसळल्याने मेथी उत्पादकांचा खर्च निघणे अवघड झाले आहे. शेतात भाजीची पूर्ण वाढ झाल्याने ती मजूर लावून उपटावी लागते. त्यानंतर त्या भाजीच्या जुडय़ा बांधणे, एखाद्या मालवाहतूक वाहनातून मार्केटला घेऊन जाणे हा खर्च सध्याच्या भावाने परवडणारा नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र भाजीपाला एवढय़ा स्वस्तात किरकोळ बाजारात मिळत नसल्याचे चित्र येथेही आहे.