कांदा चिरताना अनेकांच्या डोळय़ात पाणी येते. कांद्याचा गुणधर्म तिखट आहे. अनेक गृहिणींना हा तिखट धर्म सहन होत नाही आणि मग डोळय़ातून पाणी यायला लागते.
कांदा चिरताना अनेकांच्या डोळय़ात पाणी येते. कांद्याचा गुणधर्म तिखट आहे. अनेक गृहिणींना हा तिखट धर्म सहन होत नाही आणि मग डोळय़ातून पाणी यायला लागते. एका विनोदी कवीने ‘तुझे डोळे पाण्याने का भरले?’ असे विचारून पुढे उत्तर देऊन टाकले आहे, ‘कांदा चिरल्यामुळे..’ पण आजच्या काळात कांदा न चिरणा-यांच्या डोळय़ातही पाणी येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ती कशामुळे झाली,
तर कांद्याने सामान्य माणसाला हैराण केले. रोजच्या जीवनात किमान ‘कांदा-भाकर’ हे पदार्थ असतात. ग्रामीण भागातल्या लोकांची त्याशिवाय न्याहारी होत नाही; पण आता कांदा ६० रुपये किलोच्या पुढे गेला. येत्या आठ दिवसांत तो ७०-७५चा आकडाही गाठेल. कांद्याची आवक कमी झालेली आहे. आवक कमी, मागणी जास्त. त्यामुळे भाव चढले.
अशावेळी सरकार नावाच्या वस्तूची एक जबाबदारी असते की, त्या सरकारने आपली यंत्रणा वापरून साठेबाजांनी दडवलेला कांदा बाहेर काढणे, कांद्याचे जरुर तर रेशनिंग करणे आणि किमान किलो-दोन किलो कांदा सर्व कुटुंबांना समानपणे मिळेल, अशी योजना मार्गी लावणे; पण केंद्रातले सरकार काय आणि महाराष्ट्राचे फडणवीस सरकार काय, हे मुक्या-बहि-यांचे सरकार आहे.
आंधळय़ाचे असेही म्हणता येईल. कारण समाजात कोणते प्रश्न उग्र आहेत, कोणत्या प्रश्नावर तातडीने उपाय केला पाहिजे, याचे या सरकारला भान नाही. मोदींची गोष्ट सोडून द्या. हिटलरनंतरचा एक हुकूमशाह राज्य करतो आहे. त्यांनी अनेक घोषणा केल्या. कांदा आयातीची घोषणा त्यांनीच केली होती. तूरडाळ आयातीची घोषणा त्यांनीच केली होती. वास्तविक त्या त्या खात्याचे मंत्री आहेत, त्या मंत्र्यांना किंमत नाही.
आयातीची घोषणा झाली; पण बाजारात कांदा आला नाही, तूरडाळ आली नाही. ती येणारही नाही. जनतेची लूट मोदींनी एक वर्षापूर्वी मते लुबाडून केली. आता सामान्य माणसाला हैराण करणारी महागाई निर्माण करून हे सगळे हरामखोर मिजाशीत सत्तेत बसलेले आहेत. महागाईने उच्चांक गाठला आहे; पण ना मोदी बोलत, ना फडणवीस बोलत. सरकारात बाकी कोणाला किंमतच नाही. त्यामुळे सामान्य माणसाच्या लुटीचे काम सुरू आहे. एक आठवडय़ात कांदा २० रुपयांनी भडकला. पुढच्या आठवडय़ात आणखी २० रुपयांनी भडकेल. त्याचे कोणाला काहीही पडलेले नाही.
राज्यातील उन्हाळी कांदा उत्पादन बाजारात येऊन कधीच संपले आहे. साठवलेला कांदाही बाजारात आणला गेला आणि भाव दुप्पट झाले. लासलगाव ही कांद्याची मुख्य बाजारपेठ. घाऊक कांद्याची बोली तिथे होते. आता सरासरी ७०० रुपये क्विंटलने लासलगावात खरेदी सुरू आहे. म्हणजे किरकोळीत ७० रुपये भाव होतो; पण प्रत्यक्ष विकताना हा भाव ८० ते ९० रुपयांवर जाईल.
दिल्लीत जेव्हा भाजपाचे सरकार पराभूत झाले, त्यावेळी कांद्याने शंभरीचा भाव गाठला होता आणि कांद्यानेच भाजपाला हैराण केले. दिल्लीची सत्ता गेली. आता तोच कांदा पुन्हा उसळला; परंतु सध्या निवडणूक नसल्यामुळे भाजपाला या वाढीव किमतीबद्दल कसलीही खंत वाटत नाही. निवडणूक जवळ आली असती तर लगेच आडव्या तिडव्या घोषणा झाल्या असत्या. कांदा आयात केला गेला असता. निदान नाटक तरी केले असते.
निवडणुकीला अजून चार वर्षे आहेत आणि या देशातील जनता विसरभोळी आहे. ती काही लक्षात ठेवत नाही. त्यामुळे आता असलेली महागाई आणि कांद्याची वाढ चार वष्रे लोक लक्षात ठेवतील, असे मानणे भाबडेपणाचे आहे. ही चार वष्रे याच पद्धतीने सामान्य माणसाला लुटण्याचा कार्यक्रम चंबळ खोऱ्यातले हे प्रतिनिधी करणार आहेत.
या विरोधात ना वृत्तपत्रे बोलत, ना कोणते वाहिनीवाले ‘टीवटीव’ करत. त्यामुळे सामान्य माणसाच्या गंभीर प्रश्नात आणि जीवघेण्या महागाईवर बोलतेय कोण? निवडणूक नसल्यामुळे कोणाला बोलायची गरज वाटत नाही. बिहारमध्ये निवडणूक आली, म्हणून मोदींनी सव्वालाख कोटी रुपयांची उधळण बिहारवर केली. अगदी सरळपणे भाजपाला मते देण्याकरिता मोदींनी बिहारच्या जनतेला दिलेली ही लाच आहे.
देखावा कितीही केला तरी निवडणूक नसती तर एवढे पैसे जाहीर झाले नसते. शिवाय यांची गंमत अशी आहे की, वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी बिहारसाठी १० हजार कोटी रुपये जाहीर केले होते. त्यातला एक रुपया दिला नाही. मोदींचे तेच होणार आहे. सव्वालाख कोटी रुपये एखाद्या राज्याला उचलून देताना ना संसदेची मान्यता आहे, ना अर्थसंकल्पात तरतूद आहे. एखाद्या हुकूमशाहाने मनाला येईल त्याप्रमाणे कारभार करावा, असा हा सुलतानी कारभार आहे.
सव्वालाख कोटी जाहीर करून बसले. देणार कसे? त्यावर मोदींचे उत्तर असे आहे की, ‘द्यायचे आहेत कुणाला?’ इथे कुणाचे दिलेत तर बिहारचे बुडवायचेत? घोषणेसाठी ती घोषणा आहे. ही रक्कम बिहारला द्यायचा विषयच नाही. लोकांना मूर्ख बनवण्याचा उद्योग आहे. महाराष्ट्रातल्या भीषण दुष्काळाला मोदींनी पाच पैशाची मदत दिली नाही आणि ते देणारही नाहीत. हा माणूस अपघाताने पंतप्रधान झालेला आहे.
त्याचे लोकांशी काही घेणे देणे नाही. काही लोक दारुबाज असतात, मोदी घोषणाबाज आहेत. हातवारे करून टाळय़ा घ्यायच्या, असा हा विनोदी एकपात्री प्रयोग ते प्रभावीपणे करतात. अंमलात काही आणायचे नाही. तिकडे मराठवाडय़ातील दुष्काळी जनतेची चेष्टा, कांदा आणि जीवनावश्यक वस्तू महाग झाल्याने जनतेची चेष्टा, एकीकडे बिहारची चेष्टा, असे हे राज्य चेष्टेचे राज्य आहे.