कांजूरमार्ग पूर्व येथील ‘महापौर’ व ‘परिवार’ मैदानांची सद्य:स्थितीत दुरवस्था झाली आहे. या भागातील ही प्रसिद्ध मैदाने आहे.
मुंबई- कांजूरमार्ग पूर्व येथील ‘महापौर’ व ‘परिवार’ मैदानांची सद्य:स्थितीत दुरवस्था झाली आहे. या भागातील ही प्रसिद्ध मैदाने आहे. या मैदानांत मोठया प्रमाणात मुले खेळण्यासाठी येत असतानाही या मैदानांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात या विभागातील सामाजिक कार्यकर्ते राजेश पावसकर यांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका अधिकारी दखल घेत नसल्याने क्रीडापटू आणि क्रीडाप्रेमी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
कांजूरमार्ग पूर्व येथील महापौर व परिवार मैदानांत मोठया प्रमाणात मुले खेळण्यासाठी येतात. या मैदानांतून निपजलेल्या अनेक खेळाडूंनी कांजूरमार्गला क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवून दिला आहे. त्यामुळे या मैदानांची निगा राखणे, हे महापालिकेचे आद्य कर्तव्य होते.
सद्य घडीला अनेक मैदाने अतिक्रमणांमुळे गिळंकृत होत असताना; या भागात असलेल्या या प्रसिद्ध मैदानांचे जतन आणि देखभालीसाठी महापालिकेने प्राधान्य देणे गरजेचे आहे. महापालिका मात्र आपल्या या कर्तव्यालाच बगल देत असल्याने या भागातील नागरिकांत नाराजी आहे.
या मैदानांतील विजेचे दिवे तुटले असून; काही दिवे तर पेटतही नाहीत. मैदानांची साफसफाई होत नसल्याने मैदानात दरुगधी पसरली असून; मैदानांची कचरापट्टी होणे केवळ बाकी आहे. या मैदानांतील मुलांची खेळणीही तुटली आहेत. त्या ठिकाणी नवी खेळणी बसवण्याची तसदी महापालिकेने घेतलेली नाही. मैदानांना दिवसेंदिवस बकालपण येत आहे.
संध्याकाळच्या वेळी तर मोठया प्रमाणात मद्यप्रेमी या मैदानांना आपला अड्डा बनवतात. दारूच्या बाटल्या याच ठिकाणी टाकत असल्याने काचांचा खच मोठया प्रमाणात असतो. रात्रीचा अंधार आणि मद्यपींचा धुडगूस यामुळे या परिसरातून मार्गक्रमण करणा-या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
या सगळया समस्या लक्षात घेऊन या भागातील सामाजिक कार्यकर्ते राजेश पावसकर यांनी महापालिकेच्या भांडुप एस वॉर्ड विभागात लेखी तक्रार करून या समस्या निकाली काढण्याची विनंती केली होती. या तक्रारींची दखल न घेता महापालिकेची अधिकारी मात्र उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची खंत पावसकर यांनी व्यक्त केली आहे. परिणामी या भागातील ही मैदाने लवकरच नेस्तनाबूत होतील की काय? अशी भीती या भागातील नागरिकांना आहे.
आम्ही अनेक वेळा या मैदानांच्या दुरवस्थेबाबत महापालिकेकडे तक्रारी दिल्या आहेत. अद्याप मात्र या तक्रारींची दखल घेण्यात आलेली नाही. मुलांतील क्रीडा गुणांना वाव मिळायचा असल्यास या मैदानांचे जतन होणे आवश्यक आहे. अन्यथा, हा अनमोल ठेवा असाच हळूहळू नेस्तनाबूत होण्याची भीती आहे.
– राजेश पावसकर, सामाजिक कार्यकर्ता, कांजूरमार्ग