पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतात आलेल्या पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाने हा हल्ला भारताने घडविला असल्याचा कांगावा केला आहे. मुळात असा कांगावा पाकिस्तानकडून केला जाणार यात शंकाच नव्हती. कारण गेल्या काही वर्षापासून भारत व पाकिस्तानचे ताणलेले संबंध पाहता व तिथल्या राजसत्तेवर लष्कराचे असलेले वर्चस्व यातून अशा पथकाकडून वेगळी ती अपेक्षा काय करणार? पण या घटनेतून पाकिस्तानची मानसिकता अजूनही बदललेली नाही. ही बाब लपून राहत नाही. अशा परिस्थितीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता कोणता शांतीसंदेश घेऊन येत्या काळात पाकिस्तानात जाणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे.
उत्तर कोरियाने काही महिन्यांपूर्वी केलेली अणुचाचणी, चीनचे महासत्तेकडे पडत असलेले पाऊल, सामरिक ताकद वाढविण्याकडे असलेला कल, अमेरिका व त्यांच्या मित्र राष्ट्रांसाठी त्रासदायक ठरत आहे. चीनला थोपवून ठेवण्यासाठी भारताशी सहकार्य धोरण अबाधित ठेवणे अमेरिकेला आवश्यक आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानलाही अमेरिकेला दुखवायचे नाही. ही दोन्ही राष्ट्रे भांडत राहिली तर चीनचे आव्हान रोखणे कठीण जाऊ शकते. याची पुरती जाण अमेरिकेला आहे. त्यामुळे या दोन्ही देशांत पॅचअप करतानाच पाकिस्तानला काहीसे झुकते माप देण्याकडे अमेरिकेचा कल राहिलेला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन व त्यांचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर यांनी हे सूत्र अमेरिकेच्या राजसत्तेला दिलेले आहे. त्याचीच री त्यानंतर आलेल्या राष्ट्राध्यक्षांनी ओढलेली आहे. बराक ओबामाही त्याला अपवाद नाहीत.
भारताने अणुचाचण्या यशस्वीरीत्या केल्या. पाकिस्ताननेही आपल्याकडे अणुबॉम्ब असल्याचे सांगितेले आहे. शत्रू राष्ट्रावर ते टाकू शकतो, अशा धमक्याही दिलेल्या आहेत. अशा या पाकिस्तानने अणवस्त्रांचा कार्यक्रम काही वर्षापूर्वी उत्तर कोरियाला दिलेला आहे. अशा एकूण जगाच्या नकाशावरील घडामोडी पाहता अमेरिकेसाठी भारत व पाकिस्तान मैत्री टिकवणे आवश्यक आहे. काही महिन्यांपूर्वी मोदी व शरीफ यांची झालेली भेटही त्याच मुत्सद्दीगिरीचा भाग असल्याचे बोलले जाते. ही भेट झाल्यानंतर दोनच दिवसांत पठाणकोटच्या सैनिकीतळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामागे शरीफ यांचा राजकीय वारू रोखण्यासाठी पाकिस्तानी लष्करशाहीने खतपाणी घातल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानची जागतिक स्तरावर विश्वासघातकी अशी प्रतिमा तयार झाली होती. ती पुसण्यासाठी प्रथमच पाकिस्तानचे संयुक्त पथक भारतात आले. त्यांनी पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्याच्या ठिकाणी भेट दिली. पाकिस्तानात गेल्यानंतर मात्र त्यांनी हा हल्ला भारतानेच घडविल्याचे तारे तोडले. जागतिक पातळीवर प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी पाकिस्तानने हे पथक पाठवून आम्ही दहशतवादाला थारा देत नसल्याचे भासवले आहे. पण हा केवळ आभास असल्याचे नंतर उघड झाले आहे.
भारत व पाकिस्तानमधील सामान्यांना हे वैर नको आहे. पण पाकिस्तानमध्ये असलेल्या लष्करशाहीला भारताविषयीचे वैर हा त्यांच्या राजकारणाचा भाग वाटतो आहे. त्यामुळेच येनकेनप्रकारेन भारतातील शांतता, सर्वधर्मसमभाव यांना धक्का लावण्याचे काम अनेक हल्ल्यांतून त्यांनी करूनही दाखवले आहे. याबाबत भारत पुरावे देतो. पण नंतर पाकिस्तान त्याचा इन्कार करते. असे चालत राहिल्यास दोन्ही देशांतील विकास प्रक्रिया खुंटत आहे. ती दोन्हीही देशाला मानवणारी नाही. विशेषत: अमेरिकेच्या जीवावर उडय़ा मारणा-या पाकिस्तानला तरी.. त्यामुळे पठाणकोट हल्ल्याप्रकरणी कांगावा करून एकवेळ पाकिस्तान आजचे मरण उद्यावर ढकलेल. पण त्यातून फारसे काही निष्पन्न होणार नाही.