आज काँग्रेस पक्ष १३० वर्षे पूर्ण करून १३१व्या वर्षात पाऊल ठेवत आहे. या देशातला हा सगळ्यात जुना राजकीय पक्ष आहे. पक्ष जुना असला तरी काँग्रेसचा विचार जुनाट झालेला नाही.
या देशाच्या ऐतिहासिक आणि भौगोलिक रचनेत जे १२५ कोटी लोक राहत आहेत ते केवळ एका धर्माचे नाहीत. अमेरिकेच्या लोकशाहीचे कितीही गोडवे गायले तरी अमेरिकेची लोकशाही १०० टक्के एका धर्मीयांची आहे. त्या देशात लोकशाही राबवणे अधिक सोपे आहे. भारत हा जगाच्या पाठीवर असा एकमेव देश आहे की, या देशात धर्म, जाती, पोटजाती, रितीरिवाज, खानपान, पोषाख आणि नैसर्गिक परिस्थिती काहीही समान नाही. अतिपूर्वेकडची सात राज्ये ही डोंगरात वसलेली आहेत. राजस्थान वालुकामय प्रदेश आहे. इतकी विविधता जगात कुठच्याही देशात सापडणार नाही आणि इतक्या मोठय़ा संख्येने गुण्यागोविंदाने सर्व जातीधर्माचे लोक राहतात, हे फक्त याच देशात घडू शकते.
याचे कारण १३० वर्षापूर्वी काँग्रेसने हा विचार दिला आणि त्या विचारावरच आज देश उभा आहे आणि देशात सत्ता कोणाचीही आली तरी काँग्रेसचा हा विचार नष्ट करता येणे, कोणालाही शक्य नाही. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ‘काँग्रेस संस्कृती नष्ट करू,’ असे प्रचारात सांगण्यात येत होते. ही संस्कृती म्हणजे नेमके काय? तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी हातात हात घालून लढलेले हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, पारसी, शीख या सर्व जातीधर्माच्या लोकांचे संघटन. ती संस्कृती नष्ट कशी करणार आणि कोण करणार? आज काँग्रेसकडे देशात सत्ता नाही; पण सत्ता असणे किंवा नसणे, हा लोकशाहीतला एक अपरिहार्य भाग आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीच काँग्रेसचा जन्म झाला आणि काँग्रेस पक्षाने ते कर्तव्य अतिशय प्रभावीपणे पार पाडले. आज काँग्रेस १३१ व्या वर्षात पाऊल ठेवत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ साली झाली. म्हणजे संघ आज ९० वर्षाचा आहे. देशातल्या कम्युनिस्ट पक्षाची स्थापनाही १९२५ सालीच झाली म्हणजे कम्युनिस्ट पक्षही ९० वर्षाचा आहे. पण ना संघाने स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला, ना कम्युनिस्टांनी. डांगे यांच्यासारखे काही अपवाद आहेत. या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात १८८५ला स्थापन झालेल्या काँग्रेस पक्षाने प्रत्येक वर्षी घेतलेल्या विविध देशव्यापी अधिवेशनात स्वातंत्र्याचा लढा हे मुख्य उद्दिष्ट ठेवले होते. मिठाचा सत्याग्रह १९३०ला झाला असला तरी १८८८च्या अलाहाबाद येथील काँग्रेस अधिवेशनात मिठावर कर लावता कामा नये, अशी मागणी करण्यात आलेली होती. १८८९च्या मुंबईच्या अधिवेशनात या देशातल्या तरुणांचा मताचा अधिकार २१व्या वर्षी मिळायला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली होती. १८९१च्या नागपूर अधिवेशनात काँग्रेसचे आजचे जे नाव आहे ‘अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ ते त्या अधिवेशनात ठेवले गेले. १८९६च्या कलकत्ता अधिवेशनात रहिमतुल्ला सयानी अध्यक्ष असताना पहिल्या प्रथम बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले आणि आज राष्ट्रगान असलेले ‘वंदे मातरम’ गीत म्हटले गेले. १९१६च्या लखनौ काँग्रेस अधिवेशनात अंबिकाचरण मुजुमदार अध्यक्ष होते. त्या अधिवेशनात काँग्रेस आणि मुस्लीम लीग यांचे पुनर्मिलन झाले. १९१८च्या दिल्ली अधिवेशनात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची अध्यक्षपदी निवड झाली. १९२०च्या नागपूर येथील विजय राघवाचार्य यांच्या अध्यक्षतेखालील अधिवेशनात या देशात भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे, त्याशिवाय प्रत्येक भाषेचा विकास होणार नाही, याचा पहिल्या प्रथम उच्चार करण्यात आला. याच अधिवेशनात काँग्रेसचे सदस्य होण्याकरिता चार आणे फी असावी, हा ठराव अधिवेशनात मंजूर झाला. १९२४ सालच्या बेळगाव काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष बिनविरोधपणे महात्मा गांधींना करण्यात आले. १९२६च्या गोहाटी काँग्रेस अधिवेशनात श्रीनिवास अय्यंगार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ठरावात काँग्रेसचे सदस्य असलेल्या सर्वानी खादी वापरावी, हा प्रस्ताव मंजूर झाला होता. १९२७च्या त्यावेळच्या मद्रास येथील अधिवेशनात एन. ए. अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली या देशाला पूर्ण स्वराज मिळाले पाहिजे, हा प्रस्ताव काँग्रेसने पहिल्यांदा मंजूर केला. १९२९च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेस पक्षासाठी अंतर्गत ‘पार्लमेंटरी बोर्ड’ची स्थापना केली गेली. १९३७ला जळगाव जिल्ह्यातील फैजपूर या खेडय़ात काँग्रेसचे अधिवेशन झाले. या अधिवेशनात महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, मौलाना आझाद ही सगळी त्यावेळची दिग्गज मंडळी चार दिवस राहुटीमध्ये राहत होती.
हा सगळा तपशील या करिता नवीन पिढीला समजला पाहिजे की, १८८५ साली झालेल्या काँग्रेसने १९४७ पर्यंत या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जी लढाई लढली ती प्रत्येक अधिवेशनात टप्प्याटप्प्याने ठराव रूपात प्रगत होत होती.
पहिल्या अधिवेशनाला ८० लोक उपस्थित होते. आज काँग्रेस पक्ष एक महासागर बनला आहे. देशात असे गाव नाही, जिथे काँग्रेस नाही, काँग्रेसचा कार्यकर्ता नाही, काँग्रेसचा विचार नाही, काँग्रेसचा झेंडा नाही. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जबरदस्त आकर्षणामुळे १९५२च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेस सातत्याने विजयी होत आली. याचे कारण पंडित नेहरू होते. तो काँग्रेसचा इतिहास आज पुन्हा एकदा जागवण्याची गरज आहे. गांधी, नेहरू घराण्याचा त्याग ही काँग्रेसची मोठी पुंजी आहे. समग्र भारताचा एकत्रित विचार हे काँग्रेसचे सूत्र आहे म्हणून काँग्रेस तात्पुरती पराभूत झाली तरी कायमची पराभूत कधीही होणार नाही.