गोंधळ घालून कामकाजाचे तास वाया घालवण्याचा प्रकारामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सलग दुस-या दिवशी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
नवी दिल्ली – गोंधळ घालून कामकाजाचे तास वाया घालवण्याचा प्रकार दुस-या दिवशीही संसदेत सुरु राहिला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही सदस्यांनी गोंधळ घातल्याने प्रथम कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. दोन्ही सभागृहांमध्ये तेलंगण राज्य निर्मिती आणि तमिळनाडूतील मच्छीमारांच्या प्रश्नावरून सदस्यांनी गदारोळ केले.
काँग्रेस खासदार सब्बम हरी आणि तेलगु देसमचे एम.वेणूगोपाला रेड्डी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी नोटीस दिली आहे. गुरुवारी सकाळी कामकाज सुरु होताच खासदारांनी विविध मुद्यांवरुन गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
बुधवारचा दिवसही गोंधळी खासदारांमुळे वाया गेला होता. गुरुवारी लोकसभेचे कामकाज सुरु होताच तेलंगण विरोधी खासदारांनी लोकसभा अध्यक्षांसमोरच्या मोकळया जागेत येऊन घोषणाबाजी सुरु केली. आंध्र वाचवा असे फलक त्यांच्या हाती होते. त्याचवेळी द्रमुकच्या खासदारांनी श्रीलंकेच्या तुरुंगात असलेल्या तामिळ मच्छीमारांच्या मुद्यावरुन घोषणाबाजी सुरु केली. विविध मुद्यावरुन सुरु असलेल्या या गोंधळामुळे लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी सलग दुस-यादिवशी कुठल्याही कामकाजाविना लोकसभा तहकूब केली.
राज्यसभेमध्ये कामकाजाला सुरुवात होताच विविध पक्षांनी दिल्लीत अरुणाचलप्रदेशच्या विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूवरुन चर्चेची मागणी केली. राज्यसभा अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी भाजप खासदार रवीशंकर प्रसाद यांना या विषयावर बोलण्याचीही परवानगी दिली. मात्र अण्णाद्रमुकच्या खासदारांनी श्रीलंकेच्या तुरुंगात असलेल्या तामिळ मच्छीमारांच्या मुद्यावरुन आणि टीडीपी खासदरांनी आंध्रप्रदेशच्या विभाजनावरुन गोंधळ घातला त्यामुळे दुपारपर्यंत राज्यसभा तहकूब करावी लागली.