काँग्रेसने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला विरोध करणे एवढेच भाजपचे एकांगी धोरण आहे, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी बुधवारी केली.
बिलासपूर- काँग्रेसने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला विरोध करणे एवढेच भाजपचे एकांगी धोरण आहे, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी बुधवारी केली.
बिलासपूरमध्ये बुधवारी निवडणूक प्रचारसभेत त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्दयावरूनही भाजपवर टीका केली. हिमाचल प्रदेशातील बेरोजगारीसारख्या समस्या दूर करण्यासाठी काँग्रेसच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन त्यांनी केले.
रिटेलमध्ये एफडीआयच्या मुद्दय़ावर भाजप दुटप्पीपणा करत असल्याचा राहुल यांनी आरोप केला. ‘एफडीआयमुळे शेतक-यांना फायदा होईल, पण हा निर्णय काँग्रेसने घेतल्यामुळेच भाजप त्याला विरोध करत आहे.’ भाजप सत्तेत असताना त्यांचा एफडीआयला पाठिंबा होता याची आठवण राहुल यांनी करून दिली. अशा पद्धतीने मनरेगा, शेतक-यांना कर्जमाफी, सर्व शिक्षा अभियान यांनाही विरोध केला जाईल, अशी टीका त्यांनी केली.
‘काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले की, त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली जाते. भाजपने आपल्या नेत्यांवर काय कारवाई केली,’ असा सवाल राहुल यांनी यावेळी केला. भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी काँग्रेसने माहितीच्या अधिकाराचा कायदा केला, तर भाजपने राज्यसभेत लोकपाल विधेयकाला अडथळा आणला असे ते म्हणाले. हिमाचल प्रदेशात सत्ताधारी भाजप मनमानी पद्धतीने लोकांची जमीन घेत असल्याचा आरोप राहुल यांनी यावेळी केला. याबद्दल आपल्याकडे सामान्य लोकांनी तक्रार केली आहे, असे ते म्हणाले.
सध्याची व्यवस्था सुधारण्यासाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणात राजकारणात उतरले पाहिजे, याचा पुनरुच्चार राहुल यांनी केला. ज्या राज्यांमध्ये महिला मोठ्या प्रमाणात राजकारणात आहेत त्यांची प्रगती वेगाने झाली, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.