मोदी यांचा गुजरातमध्ये जोरदार हल्लाबोल
भावनगर – गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील यूपीए सरकारने विकास प्रकल्पांना जाणीवपूर्वक विरोध केला. त्यामुळे गुजरातचा विकास पूर्णपणे ठप्प झाला होता, अशी टीका मोदींनी केली. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
भावनगरमधील जाहीर सभेत विकासाच्या मुद्दय़ावरून काँग्रेसवर टीकेची झोड उठवली.
मी मुख्यमंत्री असताना केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील यूपीए सरकारने गुजरातचा विकास रोखण्यात कोणतीच कसर सोडली नाही, असा आरोप त्यांनी केला. वापीपासून कच्छमधील मांडवीपर्यंत विकासाची दारे बंद करण्यात आली होती. पर्यावरणाच्या नावाखाली उद्योग बंद पाडण्याच्या धमक्या देण्यात आल्या. मुख्यमंत्री असताना गुजरातच्या विकासासाठी किती संघर्ष करावा लागला हे मलाच ठाऊक आहे, असेही मोदी म्हणाले.
निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पुन्हा गुजरातला भेट देतील. या महिन्यातील त्यांचा हा तिसरा, तर सव्वा महिन्यातील पाचवा गुजरात दौरा असेल. त्यांच्या हस्ते ६१५ कोटी रुपयांच्या सागरी प्रवासी वाहतूक सेवा प्रकल्पाचे उद्घाटन झाले. दिव्यांग मुलांसोबत त्यांनी तासभर सागरी प्रवास केला. वडोद-यात १४ किमी लांब रोड-शोसह विविध कार्यक्रमांतदेखील सहभागी झाले. वडोदरामध्ये ११४० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचादेखील शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. हा सागरी प्रवासी वाहतूक सेवा प्रकल्प दक्षिण गुजरात व सौराष्ट्र यांना जोडणारा आहे. हा मार्ग तयार झाल्यामुळे दोन्ही प्रदेशांतील अंतर कमी झाले आहे.
रस्तेमार्गे हे अंतर ३१० किमीचे आहे. ते आता सागरीमार्गे केवळ ३० किमीवर येऊन पोहोचले आहे. पहिल्या टप्प्यात फेरी सेवेच्या माध्यमातून सामान्य नागरिक जहाजाने ये-जा करू शकतील. दुस-या टप्प्यात वाहनांसह ये-जा करता येणार आहे. प्रकल्पाचा कोनशिला समारंभ २०१२ मध्ये मोदींच्या हस्ते झाला होता.