कळंब-पाषणे-वांगणी रस्त्याची कारपेट डांबरीकरणाचे काम झाल्यानंतरही दुरवस्था झाली आहे
माथेरान – कर्जत तालुक्यातील कळंब-पाषणे-वांगणी रस्त्याचे काम 15 वर्षात एकदाही करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे स्थानिकांनी आंदोलन केल्यावर रस्त्यावर कारपेट डांबरीकरणाचे काम करण्यात आले. मात्र, त्यानंतरही रस्त्याची दुरवस्था झाली असून, योग्य नियोजनाअभावी दुरुस्तीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम केले होते. कळंब ते साळोख कुक्कुटपालन केंद्रापर्यंतच्या रस्त्याचे काम करण्यात आले. या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खड्डे झाले आहेत. तब्बल 15 वर्षानंतर कळंब-पाषणे या 12 किमीच्या रस्त्याच्या कामासाठी सरकारने सव्वा कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली.
2011 मध्ये काही भागात ‘बीबीएम’ डांबरीकरण करण्यात आले. हे काम मे आणि जून महिन्यात करण्यात आल्यामुळे व त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने डांबर रस्त्यावर पकडले नाही. त्यामुळे हे काम कुचकामी ठरल्यामुळे ग्रामस्थांनी मोर्चे, ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. 2012 मध्ये या आंदोलनांची दखल घेऊन कारपेट डांबर टाकणा-या ठेकेदाराला कामाची मंजुरी दिली. जून महिन्यात साडेतीन किलोमीटरच्या टप्प्याचे हे काम सुरू झाले. सुरुवातीला काही दिवस रस्ता सुस्थितीत होता. मात्र, एक ते दोन महिन्यांतच रस्ता उखडला गेला आहे. आता हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी पुन्हा खर्च करावा लागणार आहे. परंतु याबाबत बांधकाम विभागाचे अधिकारी मूग गिळून बसले आहेत.
अवसरे-मानिवली रस्त्याचीही दुर्दशा
आमदार निधीतून याच वर्षी तयार करण्यात आलेल्या अवसरे-मानिवली रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. नेरळ-कळंब जिल्हा महामार्गावरून अवसरे फाटा ते मानिवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम मे 2012 मध्ये करण्यात आले होते. ‘बीबीएम’ कारपेट डांबरीकरणाचे करण्यात आलेले हे काम खड्डय़ांत गेले आहे. हिवाळ्यात हे काम करण्याची गरज होती. मात्र, उन्हाळ्यात उशिराने हे काम केल्यामुळे व त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने डांबर रस्त्याला चिकटले नाही. हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मारकाकडे जाणारा रस्ता म्हणून या मार्गाचे काम प्राधान्याने मंजूर करण्यात आले होते. परंतु हे कामही योग्य पद्धतीने झाले नसल्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.