कर्जत तालुक्यातील कळंब-भागुचीवाडी जंगलात मोठय़ा प्रमाणात दुर्मीळ झाडे तोडण्यात आली आहेत
नेरळ – कर्जत तालुक्यातील कळंब-भागुचीवाडी जंगलात मोठय़ा प्रमाणात दुर्मीळ झाडे तोडण्यात आली आहेत. वनविभागाच्या जाचक नियमांमुळे अनेक ठिकाणच्या आदिवासी वाडय़ांत रस्ते आणि वीजपुरवठा नाही.
वनविभागाच्या ३५ सेक्शनमध्ये तर वनेत्तर कामांना पूर्णपणे बंदी आहे. असे असताना वनविभागाचे नियम धुडकावत ही झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे वनविभाग आता काय भूमिका घेतो, याकडे येथील आदिवासींचे लक्ष आहे.
कळंब परिसराला ३० वर्षापूर्वी वनविभागाच्या नियमांना सामोरे जावे लागले होते. यात वनेत्तर कामांना पूर्णपणे बंदी असलेल्या ३५ सेक्शनमध्ये हे नियम आणखीनच जाचक करण्यात आले. याशिवाय कर्जत तालुक्यातील अनेक भागांत वनविभागाचे नियम सर्वसामान्यांसाठी अडचणीचे ठरत आहेत. वनेत्तर म्हणजे जंगलतोड करण्यास आणि बांधकाम करण्यास बंदी आहे, मात्र भागुचीवाडी भागातील जंगलात असलेली सागवान, खर, ऐन आदी दुर्मीळ झाडे बिनदिक्कत तोडण्यात आली आहेत. एरवी सर्वसामान्य लोकांसाठी जळणाची लाकडे जमवण्यासही बंदी घालणारा वनविभाग याबाबत काय कारवाई करतो, याकडे आदिवासींचे लक्ष लागले आहे.