मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकें द्राच्या जागेच्या आरक्षण बदलाचा घोळ निर्माण झाल्याने मागील तीन वर्षापासून उपकेंद्राचे काम रखडले होते. मात्र नागपूरच्या हिवाळी अधिवेशात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची आरक्षण बदलास हिरवा कंदील दर्शवला आहे.
कल्याण – मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकें द्राच्या जागेच्या आरक्षण बदलाचा घोळ निर्माण झाल्याने मागील तीन वर्षापासून उपकेंद्राचे काम रखडले होते. मात्र नागपूरच्या हिवाळी अधिवेशात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची आरक्षण बदलास हिरवा कंदील दर्शवला आहे. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात उपकेंद्राच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.
कल्याण पश्चिमेतील गांधारे परिसरात विद्यापीठाचे हे उपकेंद्र साकारणार आहे. पालिकेने ९९ वर्षाच्या लीजवर एक रुपया भाडेतत्त्वावर ही जागा उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठ व पालिका प्रशासनात करारही झाला आहे. ज्या जागेवर उपकेंद्र साकारण्यात येणार आहे, ती जागा पालिकेच्या प्रारूप विकास आराखडय़ात बगीच्यासाठी आरक्षित आहे. मूळ आरक्षणात सुचवलेल्या बदलास ईपी-१ मध्ये मंजुरी दिली आहे, मात्र चार एप्रिल २०१२ च्या सरकारी राजपत्र असाधारण भाग-१ कोकण विभागीय पुरवणीत सरकारी अधिसूचना जाहीर करण्यात आलेल्या यादीत मूळ आरक्षण कायम ठेवण्यात आलेले आहे. आरक्षणात बदल न झाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. विद्यापीठ प्रशासनाने उपकेंद्राच्या पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पालिकेने मुंबई विद्यापीठ उपकेंद्राच्या इमारत बांधकामास परवानी नाकारली आहे. त्यामुळे उपकेंद्राचे काम खोळंबले आहे.
१४ एप्रिल २०१० रोजी उच्च तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे व तत्कालीन महापौर रमेश जाधव यांच्या हस्ते उपकेंद्राचा भूमिपूजन पार पडले. तब्बल तीन वष्रे होऊनही उपकेंद्राची वीटही उभी न राहिल्याने विद्यार्थ्यांत नाराजीचा सूर उमटत आहे. नुकत्याच पार पडलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी उपकेंद्रासंदर्भात लक्ष वेधले होते. तसेच मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनीही राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. अखेर बगीच्याचे आरक्षण बदलून मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनीही लवकरात लवकर कामास सुरुवात होईल, असे आश्वासन दिले आहे. तसेच पालिका आयुक्तांनीही विद्यापीठाच्या कामात कोणतीही अडचण नसून, विद्यापीठ प्रशासनाकडून नवीन प्रस्ताव आल्यानंतर त्वरित मंजुरी देण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे नववर्षात उपकेंद्राच्या कामास सुरुवात होणार असल्याने विद्यार्थीवर्गात आनंद पसरला आहे, असे स्टुडंट्स अॅक्शन फ्रंटचे अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी सांगितले.