डोंबिवली – कल्याण डोंबिवलीत येणा-या मेट्रो प्रकल्पाचे श्रेय फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असल्याचा दावा भिवंडीचे खा. कपिल पाटील यांनी केला. शनिवारी कल्याण डोंबिवली पत्रकार संघाच्या दिलखुलास संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता त्यांचाही समाचार घेतला.
मंगलप्रभात लोढा यांच्या गृहप्रकल्पाला फायदा होईल, असा मेट्रोचा मार्ग निश्चित केल्याचा आरोप आपल्यावर केला जातो. मात्र, आपण जबाबदारीने सांगतोय की आपल्या मतदारसंघात लोढा यांचा एकही प्रकल्प नाहीये. उलटपक्षी कल्याणातून शिळफाटामार्गे जाणा-या मेट्रोच्या मार्गात पलावासारखा मोठा प्रकल्प येतो. यातूनच लोढांच्या फायद्यासाठी कोण काम करतंय याची प्रचिती येते असेही त्यांनी डॉ. शिंदे यांचे नाव न घेता स्पष्ट केले. जर एखादे चांगले काम झाले तर आमच्यामुळे आणि वाईट गोष्ट झाली तर ती भाजपामुळे हे कोणते यांचे राजकारण? असा सवाल करीत सत्ताधारी म्हणून चांगल्याबरोबरच वाईट गोष्टींचीही जबाबदारी आपण एक मताने स्विकारली पाहीजे असा सल्लाही पाटील यांनी शिवसेनेला दिला.
या ठिकाणी ज्या प्रकारचे राजकारण होते तसे कुठेही केले जात नाही. किमान शहराच्या विकासकामांमध्ये तरी असले घाणेरडे करू नये. त्यामूळे शहर विकासाचे अनेक चांगले प्रकल्प मागे पडल्याची खंत व्यक्त करीत आपण शिवसेनेबरोबर याबाबत कोणत्याही वेळी चर्चेसाठी तयार आहोत, असे आवाहन केले.
एकंदर राजकीय प्रवासाबाबत सांगताना आपण आज जे आहोत ते वडिलांमुळे. त्यांनी माझ्यावर जे संस्कार केले त्यामुळेच आपण इथपर्यंतच प्रवास करू शकलो अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी यावेळी दिली. आपल्या २ तासांच्या मुलाखतीमध्ये खा. कपिल पाटील यांनी कौटुंबिक जडणघडण, ग्रामपंचायत सदस्य ते खासदारपद प्रवास, मतदारसंघातील विकासकामे-नागरी प्रश्न, समस्या, नको तितक्या राजकारणामुळे ठाणे जिल्हय़ाची झालेली पीछेहाट आदी महत्वाच्या विषयांवर अत्यंत मनमोकळेपणे मतं व्यक्त केली.