प्रत्येक सरकारी योजनेसाठी आधारकार्ड सक्तीचे केल्याने आधारकार्ड केंद्रांवर नागरिकांची झुंबड उडत आहे.
कल्याण – प्रत्येक सरकारी योजनेसाठी आधारकार्ड सक्तीचे केल्याने आधारकार्ड केंद्रांवर नागरिकांची झुंबड उडत आहे. मात्र या केंद्रांवर असलेली अपुरी यंत्रणा आणि मनुष्यबळाचा फटका सहन करावा लागत असल्याने कल्याण-डोंबिवलीकर त्रस्त झाले आहेत. परिणामी कल्याण-डोंबिवलीतील सुमारे साडेपाच लाख नागरिक अद्याप आधारकार्डच्या प्रतीक्षेत असून, आधार केंद्राची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
केंद्र सरकारने नियोजन आयोगाच्या अधिपत्याखाली भारतातील रहिवाशांना ओळखपत्र देण्यासाठी ‘युनिक आयडेंटिटी ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ या प्राधिकरणाची स्थापना केली आहे. त्याअंतर्गत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून यूआडी(आधार) ही ओळखपत्रे दिली जात आहेत. आधारकार्डच्या नोंदणीसाठी महापालिका क्षेत्रात राज्य सरकारकडून सिल्व्हर टच आणि कारवी या दोन खासगी कंपन्या काम करत आहेत.
दोन्ही कंपन्यांची एकूण ४५ मशिन्स कार्यरत आहेत. पालिकेकडून संबंधित कंपनीला जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका केंद्रावर केवळ एक ते दोन युनिट व चार ते पाच कर्मचारीच असल्याने १५ ते २० मिनिटांच्या कामासाठी अर्धा ते पाऊण तास लागत आहे. एका केंद्रावर फक्त ५० कुटुंबांचे फॉर्म भरून घेतले जात असल्याने सकाळपासूनच नागरिकांची झुंबड उडते. परिणामी कल्याण-डोंबिवलीत केवळ सुमारे पाच लाख आधारकार्डची नोंदणी झाली असून, आणखी साडेपाच लाख नोंदणी शिल्लक आहे, अशी माहिती पालिकेचे सचिव सुभाष भुजबळ यांनी दिली.
रांगेचा ‘गैरफायदा’!
या आधार केंद्रांवर लागत असलेल्या लांबच लांब रांगांचा गैरफायदा अनेक जण घेत असून, एक फॉर्म २० ते ५० रुपयांपर्यंत विकला जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. आधार केंद्रावर गर्दी वाढत असल्याने ४५ मशिन्स अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे नागरिकांची नावनोंदणी करून त्यांना पुढील तारीख देण्यात येत आहे. मात्र, आधारकार्डची सक्ती करणा-या सरकारने तेवढय़ा प्रमाणात आधार केंद्रांची सोय करणेही गरजेचे आहे, अशी खंत नागरिकांतून व्यक्त होत आहे. आधारकार्ड काढण्यासाठी नागरिकांची उडणारी तारांबळ लक्षात घेऊन सरकारने त्वरित आधार केंद्र वाढवावीत, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.
वाडावासीयांची ‘आधार’विना परवड
कुडूस – आधारकार्ड काढण्यासाठी धडपड करणा-या वाडा तालुक्यात केवळ एकच आधार केंद्र असल्याने स्थानिकांची मोठी परवड होत आहे. सर्वसामान्य तर दूरच पण शिक्षकांनाही आधारकार्ड अद्याप मिळाले नसल्याची ओरड ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे. याप्रश्नी स्वाभिमान संघटनेचे तालुका अध्यक्ष नितेश पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून, केंद्रे न वाढवल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचे म्हटले आहे.
मजूर, शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार सर्वासाठीच आधारकार्ड सरकारने सक्तीचे केले आहे. वाडा तालुक्यात मात्र केवळ एकच आधार केंद्र असल्याने एका केंद्रावर प्रचंड गर्दी उसळत आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावे आधारविना असल्याचे चित्र आहे. या विषयावर स्थानिक राजकीय व सामाजिक संघटनाही चिडीचूप असल्याने सर्वसामान्यांत असंतोष आहे.
शिक्षकांना पगारासाठी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, तालुक्यातील अनेक शिक्षकांना आधारकार्डच मिळाले नसल्याने त्यांची पंचाईत होऊन बसली आहे. आधारसाठी काहींची नोंदणी होऊनही वर्ष उलटले तरी त्यांना आधारकार्ड मिळाले नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे वाडा तालुक्यातील आधार केंद्रांची संख्या वाढवून नोंदणी प्रक्रिया जलद करण्याची मागणी स्वाभिमान संघटनेतर्फे करण्यात आली आहे.