राज्यातील भीषण दुष्काळाच्या दाहकतेने मुंबईसह कल्याण डोंबिवली शहराला पाणी पुरवठा करणा-या बारावी धरणाने तळ गाठला.
कल्याण- राज्यातील भीषण दुष्काळाच्या दाहकतेने मुंबईसह कल्याण डोंबिवली शहराला पाणी पुरवठा करणा-या बारावी धरणाने तळ गाठला. यामुळे ओढवलेल्या पाणी संकटावर मात करण्यासाठी आमदार नरेंद्र पवार यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देऊन कल्याण-डोंबिवली महापालिकेचे पाण्याचे मुख्य स्रेत असलेल्या उल्हास नदीतून नेहमीपेक्षा अधिक ५० एमएलडी पाणी मिळाण्याबाबत विनंती केली होती.
या प्रश्नी आमदार पवार यांनी केलेली विनंती मान्य करीत वाढीव पाणी देण्याचे आदेश मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधिताना दिले आहेत. त्यानुसार उल्हास नदीतून पहिल्या टप्यात महापालिकेने १० एमएलडी अधिक पाणी उचलण्यास सुरुवात केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ‘पाणीबाणी’ची परिस्थिती आहे. मागील वर्षी वरुणराजाने पाठ फिरवल्यामुळे एरवी पावसाळ्यापर्यंत पाण्याचा मुबलक साठ देणारी धरणे कोरडी पडली आहेत. यामुळे ओढवलेल्या पाणी कपातीतून कल्याण-डोंबिवली महापालिकाक्षेत्र देखील सुटले नाही.
कल्याण डोंबिवली महापालिकेची पाण्याची आवश्यक्ता ३६४ एमएलडी इतकी आहे. यामध्ये महापालिका आजवर काळू नदीतून ६० एमएलडी, महाराष्ट्र औदोगिक विकास महामंडळाकडून ३० एमएलडी आणि उल्हासनदीतून २५० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो.
मात्र पाण्याच्या स्रेतांपैकी काळू नदीच्या पाण्याची गुणावत्ता खालावल्यामुळे आणि पाणी पुरवठा योजना जीर्ण झाल्यामुळे येथील पाणी पुरवठा बंद आहे. परिणामी यामुळे पाण्याच्या कपातीचे संकट कल्याण डोंबिवलीकारांवर आले होते. मात्र याबाबत आमदार नरेंद्र पवार यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देऊन पाणी कपातीचे संकट काही अंशी कमी करण्यासाठी उल्हास नदीतून ५० एमएलडी अतिरिक्त पाणी पुरवठा करून देण्याची विनंती केली होती.