बाळासाहेबांच्या बालपणातील काही काळ कल्याणात गेला. त्यामुळे बाळासाहेब आणि कल्याणकर यांच्यामध्ये एक अतुट नाते होते.
कल्याण – बाळासाहेबांच्या बालपणातील काही काळ कल्याणात गेला. त्यामुळे बाळासाहेब आणि कल्याणकर यांच्यामध्ये एक अतुट नाते होते. कल्याण पश्चिमेतील टिळक चौकातील एका चाळीत व काळातलाव परिसरात काही काळ प्रबोधनकार ठाकरे राहिले. कल्याणातील पदाधिकारी जेव्हा बाळासाहेबांना भेटायला जात, तेव्हा ते ‘काळा तलावाचे काय झाले? काळा तलाव गोरा झाला का?,’ असा प्रश्न नेहमीच विचारत. १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली. त्यानंतर १९६७ साली किल्ले दुर्गाडीवर नवरात्रोत्सवासाठी बाळासाहेब हे माँसाहेबांसोबत हजर होते. त्यावेळी बंदी असतानाही त्यांनी सपत्नीक पूजा केली होती. कल्याणात शिवजयंती उत्सवाला ही बंदी होती. १९८४ साली बंदी हुकूम मोडून बाळासाहेब स्वत: मिरवणुकीत सहभागी झाले. ही मिरवणूक दूधनाका येथून गेली. वाटेत तीन ठिकाणी बाळासाहेबांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यावेळी शहरप्रमुख असलेले जुने कार्यकर्ते बाळ हरदास यांनी ही आठवण सांगितली. बाळासाहेबांचे कल्याणशी जुने नाते होते. त्यामुळे कल्याणच्या प्रत्येक घडामोडीवर त्यांचे लक्ष असे. शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर कल्याणातही सुभाष शाहीवाले यांच्या पुढाकाराने संघटना उभारण्यास सुरुवात झाली. माधव कर्वे हे कल्याणातील पहिले शाखाप्रमुख होते. शाहीवाले यांचे नेतृत्व निर्भीड होते, असेही हरदास यांनी सांगितले. बाळासाहेबांच्या निधनाच्या वृत्ताने कल्याण-डोंबिवलीकर हेलावून गेले. संध्याकाळी पाच वाजता निधनाचे वृत्त झळकताच कल्याण-डोंबिवलीत उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. दुकाने, रिक्षा, हॉटेल्स बंद करण्यात आले. रस्त्यावर शुकशुकाट पसरला. सर्वपक्षीय नगरसेवक व नेतेमंडळींनी शिवसेना मध्यवर्ती शाखेवर धाव घेऊन दु:खद व्यक्त केले.