विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बसवणार ३०० कॅमेरे
मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये २०१२ मध्ये सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावेळी कलिना कॅम्पसमधील ६० इमारतींसाठी २९९ सीसीटीव्हींची गरज असल्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तब्बल चार वर्षानंतर आसा कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा हवाला देत ३०० सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठात जवळपास ३०० सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. तसेच विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी कलिना कॅम्पसमध्ये २ पोलीस चौकीही उभारण्यात येणार असल्याची घोषणाही विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील रानडे भवनात ४ ऑगस्टला एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला होता.
या प्रकरणानंतर विद्यापीठात काही ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याचे स्पष्ट झाले होते, यावर अनेक विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत विद्यापीठ प्रशासनाची भेट घेतली होती. या भेटीतील चर्चेदरम्यान कलिना कॅम्पसमध्ये २ पोलीस चौकी उभारण्यात येणार असल्याचे सांगितले होते. तसेच विद्यापीठात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमरेही बसवण्यात येणार असून विद्यार्थिनीना स्वसंरक्षणाचे धडेही दिले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता.
२०१२ साली मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावेळी कलिना कॅम्पसमधील ६० इमारतींसाठी २९९ सीसीटीव्हीची गरज असल्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, आजतागायत कलिना कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठात कुलगुरूंचे निवासस्थान असून या ठिकाणीही सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत नसल्याने विद्यापीठात कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याची माहिती पोलिसांना कशी कळणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र विद्यार्थ्यांना प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत सीसीटीव्ही लावण्यास प्रशासनाला भाग पाडल्याचे विद्यार्थी संघटनांकडून सांगण्यात आले.