सुभाष देशमुख यांची माहिती
सोलापूर – शेतकरी कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील साडेआठ लाख रुपये शेतक-यांच्या खात्यात सोमवारी जमा होणार आहेत. सलगच्या तीन सुट्टय़ांमुळे पैसे जमा होण्यास उशीर झाला, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.
कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी १८ ऑक्टोबरचा मुहूर्त शोधण्यात आला होता. राज्य सरकारकडून प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येक जिल्ह्यातील दोन शेतक-यांना कर्जमाफी प्रमाणपत्र देण्यात आले होते. तर उर्वरित शेतक-यांचे पैसे लगेच खात्यात जमा होतील, असे सांगण्यात आले होते. चार दिवस उलटूनही पैसे जमा न झाल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत होते. पहिल्या टप्प्यातील शेतक-यांसाठी चार हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सोमवारपासून खात्यात पैसे जमा होतील, असे सुभाष देशमुख यांनी सांगितले.
राज्यातील सुमारे ८९ लाख शेतक-यांना ३४ हजार २२ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. २४ जून रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील सुमारे ४० लाख शेतक-यांचा सातबारा कोरा करणारी ही कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना म्हणून ओळखली जाणार आहे. या योजनेचा लाभ पीक कर्जासह मध्यम मुदतीच्या कर्जधारकांनाही होणार आहे.