तालुक्यात सोमवारी सायंकाळी पोखरकरवाडी आणि कशेळे या दोन ठिकाणी वणवे लागले. रेल्वे पट्टय़ातील डोंगर परिसरातील सात किमीची पर्वतरांग आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
नेरळ – तालुक्यात सोमवारी सायंकाळी पोखरकरवाडी आणि कशेळे या दोन ठिकाणी वणवे लागले. रेल्वे पट्टय़ातील डोंगर परिसरातील सात किमीची पर्वतरांग आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. झाडाझुडपांसोबतच येथील गवतही राख झाल्यामुळे गुरांच्या चा-याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे वणवे विझवण्यासाठी रसायनी, खोपोली आणि कर्जत येथील अग्निशमन केंद्रातून अग्निशमन वाहने पाठवण्यात आली तसेच प्रभारी तहसीलदार ए. के. खटके यांनी घटनांची माहिती घेतली. पोखरकरवाडी व कशेळे भागात लागलेल्या वणव्यांमुळे मोठया प्रमाणात वनसंपत्तीची हानी झाली आहे. माथेरानच्या पायथ्याशी आदिवासींची वस्ती मोठया प्रमाणात आहे. जंगलसंपत्ती गोळा करून हे आदिवासी आपला उदरनिर्वाह चालवतात.
मध गोळा करणे, औषधी झाडे तसेच रानफळांची विक्री हे आदिवासी करतात. मात्र वणव्यांमुळे वनसंपत्तीच नष्ट होत असल्यामुळे या आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाले आहे. दुसरीकडे आदिवासींच्या जनावरांसाठी लागणारा चाराही जळून गेल्यामुळे गुरे जगवण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. येथील १५ आदिवासीपाडयांमध्ये जवळपास ७ ते ८ हजार गुरे आहेत.
पावसाळ्यात वाढलेले गवत मे महिन्यापर्यंत पुरवण्यासाठी आदिवासी त्याची कापणी करतात. मात्र यंदा पाऊसही कमी झाल्यामुळे पुरेसे गवत उपलब्ध होऊ शकले नाही. शिल्लक असलेले गवतही वणव्यात जळून गेल्यामुळे अदिवासी हवालदिल झाले आहेत. उमरोली, किरवली, चिंचवाडी, सावरगाववाडी आदी ७ ते ८ किमी भागात वणवा पसरला होता. त्यामुळे चारा नष्ट झाल्याने पर्यायी व्यवस्था करण्याची गरज पंचायत समिती सदस्य लक्ष्मी सांबरी यांनी व्यक्त केली आहे. त्यातच लाकूडफाटाही जळून गेल्यामुळे जळणाचाही प्रश्न आहे.