देशभर गेल्या दोन महिन्यात मान्सूनने अपेक्षेप्रमाणे कामगिरी नसली तरी यंदा कृषी उत्पादन चांगले होईल, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली- देशभर गेल्या दोन महिन्यात मान्सूनने अपेक्षेप्रमाणे कामगिरी नसली तरी यंदा कृषी उत्पादन चांगले होईल, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. मान्सून सरासरीपेक्षा 15 टक्के कमी झाला असला तरी 2009 च्या दुष्काळी वर्षापेक्षा कृषी उत्पादन चांगले होईल असे सरकारने म्हटले आहे. हवामान खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एक जुलै ते एक ऑगस्ट या कालावधीत देशात मान्सून सरासरीपेक्षा 15 टक्के कमी झाला आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या राज्यांमधील कृषी उत्पादनाबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र असे असले तरी यंदा कृषी उत्पादनामध्ये फारशी घट होणार नाही. चालू वर्षात अन्नधान्यांचे चांगले उत्पादन होईल असे केंद्रीय कृषी आणि संसदीय कार्य राज्यमंत्री हरीश रावत यांनी सांगितले.
2009 मध्ये देशाला मान्सूनच्या लहरीपणाचा फटका बसला होता. कृषी क्षेत्राला दुष्काळाला सामोरे जावे लागल्यामुळे अन्नधान्यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. 2009 च्या तुलनेत यंदा दुष्काळसदृश्य भागांची संख्या कमी असल्याचे रावत यांनी सांगितले. तसेच दृष्काळाचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कमी पावसाचा फारसा फटका खरिप हंगामातील उत्पादनांना बसणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दुष्काळासाठी केंद्राने 320 जिल्हयांसाठी विशेष योजना तयार केली आहे.
सरकारच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा खरिप हंगामात लागवडीखालील क्षेत्रामध्ये नऊ टक्क्यांची घट झाली आहे. यंदा खरिप हंगामात आठ कोटी 02 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. 2011-12 या वर्षात देशात 25 कोटी 74 लाख टन अन्नधान्यांचे विक्रमी उत्पादन झाले आहे.