कर्जत तालुक्यातील नेरळमधील जिल्हा परिषदेची कन्या शाळेच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जीर्ण झालेली ही इमारत धोकादायक झाली आहे.
नेरळ- कर्जत तालुक्यातील नेरळमधील जिल्हा परिषदेची कन्या शाळेच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जीर्ण झालेली ही इमारत धोकादायक झाली आहे. मात्र यंदा शैक्षणिक वर्षे सुरू झाल्यापासून या इमारतीमध्ये शाळा भरवली जात नाही. या ठिकाणी नवी इमारत बांधण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेने चार वर्षात अनेक ठराव केले. परंतु नव्या इमारतीचे प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनीही या ठिकाणी नवी इमारत बांधण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतर जिल्हा परिषदेने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे.
नेरळमध्ये जिल्हा परिषदेची कन्याशाळा चालविली जाते. या शाळेच्या कौलारू इमारतीला शंभर वर्ष झाली आहेत.
त्यामुळे इमारतीची कमालीची दुरवस्था झाली आहे. कर्जत पंचायत समितीला चार वर्षापासून सातत्याने शाळा व्यवस्थापन समितीने तक्रार केली आहे. शाळेच्या जीर्ण भिंती कोसळण्याची भीती असल्याने कर्जत पंचायत समितीच्या परवानगीने दोन वेळेत शाळा भरवली जात आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी शेषराव बढे, सर्व शिक्षा अभियानचे कार्यकारी अभियंता गावंड यांनी नेरळ येथे येऊन इमारतीची पाहणी केली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांनीही शालेय व्यवस्थापन समितीच्या विनंतीनंतर शाळेला भेट दिली होती. त्यांनी जुनी इमारत जमीनदोस्त करून नवी दुमजली इमारत बांधली जाईल, असे आश्वासन शालेय व्यवस्थापन समितीला दिले होते.
त्यानंतर अडीच महिन्याचा कालावधी लोटला तरी प्रमुख अधिकारी आणि पदाधिकारी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. त्यात जिल्हा परिषदेकडून यापूर्वी दिलेल्या ठराव आणि केलेला पत्रव्यवहार याबाबत कोणतेही उत्तर देणारे पत्र आजपर्यंत एकदाही नेरळ कन्याशाळेला मिळालेले नाही. जिल्हा परिषद आपली जबाबदारी झटकून ठेवण्यासाठी सातत्याने ठराव पाठवला नाही, असे जुजबी उत्तर देत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या या ढिसाळ कारभाराला कंटाळून येथील शाळा व्यवस्थापन समितीने ‘येथील विद्यार्थिनींनी शिकायचे नाही का’ असा संतप्त सवाल केला आहे. समितीच्या अध्यक्षा कविता अशोक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर नुकतीच बैठक झाली. त्यावेळी उपाध्यक्ष सुभाष नाईक, यांच्यासह ५५ पालक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनींच्या पालकांना परिस्थितीची माहिती देण्यात आली.