विविध मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांनी गुरुवारी नवी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढला होता.
नवी मुंबई- विविध मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांनी गुरुवारी नवी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढला होता. या मागण्यांबाबत कोणत्याच प्रकारचा तोडगा निघत नसल्याने हताश झालेल्या कामगारांनी एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलन करून भव्य मोर्चा काढला.
या मोर्चानंतर संघटनेच्या वतीने पालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांना आंदोलनातून मार्ग निघावा यासाठी लेखी निवेदन दिले. मात्र याबाबत समिती नेमून मगच निर्णय घेतला जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
संघटनेच्या पदाधिका-यांना हे मान्य नसल्याने कामगारांना प्रशासन ठोस निर्णय देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचा निर्धार कामगारांनी केला. येत्या ११ डिसेंबर रोजी नागपूर येथे होणा-या हिवाळी अधिवेशनात कामगार उपोषण करणार आहेत.
कंत्राटी कामगारांना कायम करण्यात यावे, कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनात वाढ करण्यात यावी, समान काम समान वेतनातील त्रुटी दूर करून कायम कामगारांप्रमाणे वेतन देण्यात यावे इत्यादी मागण्यांसाठी जवळपास दोन महिने हे आंदोलन सुरू आहे.