कंत्राटदार आणि प्रशासनातील अधिका-यांच्या आडमुठय़ा धोरणामुळे येथील रहिवाशांना पावसाळ्यात खड्डय़ांतून वाट काढावी लागणार आहे.
मुंबई- पूर्व उपनगरातील रस्त्यांच्या कामांसाठी नियुक्त केलेल्या पात्र कंत्राटदारालाच न्यायालयाने बाद ठरवल्यामुळे दुस-या क्रमांकावरील कंत्राटदाराला काम देण्याऐवजी नव्याने निविदा मागवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे पूर्व उपनगरातील ११७ रस्त्यांची कामे रखडली असून, कंत्राटदार आणि प्रशासनातील अधिका-यांच्या आडमुठय़ा धोरणामुळे येथील रहिवाशांना पावसाळ्यात खड्डय़ांतून वाट काढावी लागणार आहे. त्याचे तीव्र पडसाद मंगळवारी स्थायी समितीत उमटल्याने कामकाज तहकूब करण्यात आले. सलग दुस-यांदा स्थायी समितीत अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांना टार्गेट करण्यात आल्यामुळे कंत्राटदारांवरील ‘असीम’ भक्ती त्यांना भोवत असल्याचे स्पष्ट होत आहे.
पूर्व उपनगरातील ११७ रस्त्यांच्या कामांसाठी मागवलेल्या निविदांमध्ये डांबरीकरणासाठी जे. कुमार आणि वित्राग ही कंपनी पात्र ठरली. परंतु, एकूण कामाच्या ३० टक्के अनुभव असणे बंधनकारक असल्यामुळे त्याविरोधात दुस-या क्रमांकावरील महावीर कंपनी न्यायालयात गेली होती. न्यायालयानेही जे. कुमार कंपनीला दिलेल्या कामावर शंका उपस्थित करत त्यांना कंत्राट न देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे दुस-या क्रमांकावरील महावीर कंपनीला काम देण्याचा निर्णय घेणे आवश्यक होते. परंतु, आपल्या विश्वासातील कंपनीविरोधात महावीर कंपनी न्यायालयात गेल्यामुळे त्याचा राग काढत अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांनी या कंपनीचे सात-आठ महिन्यांपूर्वीपासून दुर्लक्ष केलेल्या निकृष्ट दर्जाच्या पेव्हरब्लॉकचे प्रकरण बाहेर काढले. तसेच महावीर कंपनीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.
महावीर ही दुस-या क्रमांकावरील कंपनी असल्यामुळे त्यांना काम देण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांचे आहेत. परंतु, या कंपनीविरोधात आधीच गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यामुळे त्यांना काम देण्याऐवजी नव्याने निविदा काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
पूर्व उपनगरातील रस्त्यांची कामे रखडल्यामुळे मागील स्थायी समितीत गुप्ता यांना धारेवर धरणा-या स्थायीच्या सदस्यांनी मंगळवारी खड्डय़ांच्या खर्चाचा प्रस्ताव येताच प्रशासनाला कोंडीत पकडले. खड्डे बुजवण्याचे कंत्राट ‘अताशा आशीर्वाद बिल्डर्स-एसटीजी’ या कंपनीला निविदा न भरताही देण्यात आले आहे. त्यामुळे त्याला सदस्यांनी आक्षेप घेतला. रस्त्यांच्या कामांसाठी दुस-या क्रमांकावरील कंपनीला काम देता पुन्हा निविदा मागवली जाते, तर मग या कंपनीला निविदा न मागवता परस्पर कसे काम देण्यात आले, असा सवाल सपाचे गटनेते रईस शेख यांनी केला. त्यामुळे याचा निषेध म्हणून सभा तहकूब करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
याला काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनीही पाठिंबा दिला. कंत्राटदाराला फेव्हर करण्यासाठी आणि सूड उगवण्यासाठी पूर्व उपनगरातील रस्त्यांचे हे काम असीम गुप्ता करत नसल्याचा आरोप मनोज कोटक यांनी केला. त्यामुळे सर्वच सदस्यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे कोणतेही कामकाज न करता स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सभा तहकूब करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा तीव्र निषेध केला.