तीन महिन्यांपूर्वी महापालिकेची ओसी मिळूनही म्हाडाने तब्बल ५८३ घरांचा ताबा का रखडवला, याचे उत्तर मात्र समाधानकारक मिळत नसल्याने लाभार्थी म्हाडाचे उंबरठे झिजवत आहेत.
मुंबई- म्हाडाचे घर लागल्यावर महापालिकेची ओसी नसल्याने ताबा रखडला, हे म्हाडाचे कारण ठरलेलेच असते. पण आता तीन महिन्यांपूर्वी महापालिकेची ओसी मिळूनही म्हाडाने तब्बल ५८३ घरांचा ताबा का रखडवला, याचे उत्तर मात्र समाधानकारक मिळत नसल्याने लाभार्थी म्हाडाचे उंबरठे झिजवत आहेत. दरम्यान, घराच्या ताबा प्रक्रियेपूर्वी म्हाडाकडून तात्पुरते देकारपत्र (पीओएल) पाठवण्यात येते. मात्र तेही न मिळाल्याने लाभार्थी संतप्त झाले आहेत.
म्हाडाच्या २०१२च्या सोडतीतील विनोबा भावेनगर, प्रतीक्षानगर व मालवणी-मालाड या प्रकल्पांतील विजेत्यांची पात्रता निश्चित झाल्यावर त्यांनी म्हाडाकडे आवश्यक कागदपत्रेही सादर केली आहेत. मात्र ओसी मिळाल्याशिवाय महापालिका घरांची ताबा प्रक्रिया सुरू करत नाही. यापूर्वीच्या अनेक प्रकल्पांतील विजेत्यांना ओसी मिळाली नाही म्हणून दोन ते अडीच वर्षे घरांचा ताबा रखडला होता. मात्र या प्रकल्पांना महापालिकेची ओसी लवकर मिळाली असतानाही घरांचे देकारपत्र म्हाडाकडून पाठवण्यात आले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ओसी मिळाल्याचे लाभार्थ्यांना समजल्यावर काहींनी घराची रक्कमही तयार ठेवली आहे. मात्र म्हाडाकडून देकारपत्रच आलेले नसल्याने लाभार्थी संभ्रमात आहेत.
लाभार्थ्यांना चौकशीसाठी सातत्याने चकरा माराव्या लागत आहेत. मात्र ‘तुम्हाला कळवले जाईल, देकारपत्र तुमच्या पत्त्यावर पाठवू त्यानंतर ताबा प्रक्रिया सुरू होईल,’ असे ठरलेले उत्तर गेल्या तीन महिन्यांपासून म्हाडाकडून दिले जात आहे. पण, नेमके कारण समजत नाही, शिवाय पत्ता चुकीचा आणि कोणत्या तरी गोंधळामुळे देकारपत्र मिळालेच नाही तर मुदत संपेल आणि लागलेले घर हातातून जाईल, अशी भीती असल्याने चौकशीसाठी चकरा माराव्या लागत असल्याचे काही लाभार्थ्यांनी सांगितले.