‘म्हाडा’च्या सोडतीत घर लागले, पण पालिकेची ओसी मिळाली नसल्याने घराची रक्कम भरूनही विजेत्यांना तीन ते चार वर्षापासून घराची प्रतीक्षा करावी लागली आहे.
मुंबई – ‘म्हाडा’च्या सोडतीत घर लागले, पण पालिकेची ओसी मिळाली नसल्याने घराची रक्कम भरूनही विजेत्यांना तीन ते चार वर्षापासून घराची प्रतीक्षा करावी लागली आहे.
याबाबत ओरड झाल्यावर जाग आलेल्या म्हाडाने ओसी लवकर मिळावी यासाठी उपाययोजना न शोधता, या पुढच्या सोडतीत ज्या इमारतींना ओसी मिळाली असेल त्याच घरांचा सोडतीत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षीच्या मे महिन्यात म्हाडाकडून काढण्यात येणा-या सोडतीसाठी हजारो अर्ज येतात. या सोडतीत विजेते ठरलेल्या अर्जदारांकडून घराची पात्रता निश्चित झाल्यावर घराची पूर्ण रक्कम घेतली जाते. रक्कम भरल्यावर घराचा काही दिवसांत ताबा मिळेल या अपेक्षेत विजेते असतात. मात्र पुढे विजेत्यांचा अपेक्षाभंग होतो.
तीन ते चार वर्ष पैसे भरूनही घरांचा ताबा मिळत नाही. ताबा का मिळत नाही, याची चौकशी के ल्यावर पालिकेची ओसी अद्याप मिळाली नसल्याने ताबा देता येत नाही, अशी कारणे म्हाडाकडून ऐकायला मिळतात. ओसी मिळेपर्यंत रहिवाशांना घराची प्रतीक्षा करावी लागते.
घराची रक्कम भरण्यासाठी व्याजाने काढलेल्या रक्कमेचे व्याज वाढते; पण घराचे स्वप्न वेळेत पूर्ण होत नाही. योजनांना पालिकेची ओसी लवकर मिळेल यासाठी कोणतीही उपाययोजना न करता अशा घरांचा सोडतीत समावेश न करण्याचा निर्णय घेतला आहे.
२०११च्या सोडतीतील अजूनही २० टक्के विजेत्यांचा ओसीविना घराचा ताबा रखडला आहे. २०१२च्या सोडतीत ८४२ घरांची सोडत काढण्यात आली. पण यातील १६५ विजेत्यांना तीन वर्षानंतरही ओसीविना घराचा ताबा मिळालेला नाही. २०१३च्या सोडतीत काढण्यात आलेल्या १२४४ घरांच्या सोडतीत फक्त २०० घरांनाच ओसी मिळाली आहे.
उर्वरित घरांना कधी ओसी मिळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे २०० अर्जदारांनाच म्हाडाने पुरावे सादर करण्यासाठी सूचनापत्र पाठवली आहेत. या सर्वाचा विचार करून येत्या सोडतीत फक्त ओसी मिळालेल्या घरांचीच सोडत काढण्याचा निर्णय म्हाडाने घेतला असल्याचे सहमुख्य अधिकारी चंद्रकांत डांगे यांनी सांगितले.