भारतामध्ये विविध भागात थंडीचा कडाका खूपच जास्त प्रमाणात वाढलेला असताना, ऑस्ट्रेलियात मात्र कडक उन्हाळा सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियातील नागरिकांना या कडक उन्हाळ्याच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
भारतामध्ये विविध भागात थंडीचा कडाका खूपच जास्त प्रमाणात वाढलेला असताना, ऑस्ट्रेलियात मात्र कडक उन्हाळा सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियातील नागरिकांना या कडक उन्हाळ्याच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. येथील तापमान येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हे तापमान ५० अंश सेल्शियसच्या वर जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. वाढलेल्या तापमानामुळे जंगलात वणवे भडकण्याच्या घटना घडत आहेत. त्याच प्रकारे नागरी वस्तीमधील लोकांनाही त्याची झळ बसत असून, त्यामुळे मोठया प्रमाणात स्थलांतर होत आहे.
हवामान विभागाकडून तापमानाची तीव्रता दाखवणा-या रंगीत नकाशांमध्ये नव्या गुलाबी रंगाची भर पडली आहे. हा रंग ५२ ते ५४ अंश सेल्शियस तापमान दाखवण्यासाठी वापरला जातो. ऑस्ट्रेलियामध्ये यापूर्वी १९६०च्या जानेवारी महिन्यात ‘उडनॅडेटा’ येथे ५०.७ अंश सेल्शियस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली होती.
वाढलेल्या तापमानामुळे न्यू साउथ वेल्स या ऑस्ट्रेलियातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यात १००हून अधिक वणव्यांची नोंद झाली आहे. जागतिक तापमानवाढीचा हा परिणाम असून, पुढील काळात त्याची तीव्रता आणखी वाढण्याची भीती ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी व्यक्त केली आहे.