भारत ४-१ असा विजय मिळवेल माजी कसोटीपटू लक्ष्मणचा विश्वास
नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाची दुबळी गोलंदाजी पाहता भारताचा संघ ४-१ अशा फरकाने वनडे मालिका जिंकेल, असा विश्वास माजी कसोटीपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने मंगळवारी व्यक्त केला.
‘‘२०१३मध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारतात आला तेव्हा त्यांच्याकडे प्रभावी गोलंदाज होते. मात्र यावेळची पाहुण्यांची गोलंदाजी अस्थिर वाटते. मिचेल स्टार्क आणि जोश हॅझ्लेवुडची अनुपस्थिती त्यांना जाणवेल. पॅट कमिन्स आणि नॅथन कॉल्टर नाईलला भारतात खेळण्याचा अनुभव आहे. मात्र फिरकी मारा कमकुवत आहे. पाहुण्यांची भिस्त ऑफस्पिनर नॅथन लियॉनवर आहे. मात्र भारताचे गोलंदाज फिरकी चांगल्याप्रकारे खेळून काढतात. दुबळा फिरकी मारा यजमानांसाठी जमेची बाजू ठरू शकते,’’ असे लक्ष्मणने म्हटले. श्रीलंकेनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध म्हणजे सलग दोन वनडे मालिकेत भारताने अनुभवी स्पिन दुकली आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाला विश्रांती दिली. मात्र अश्विन हा कौंटी स्पर्धेत खेळत असल्याने त्याला वगळले की विश्रांती दिली, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
याबाबत विचारले असता, ‘‘ढेपाळलेला श्रीलंका संघ पाहता त्या दौ-यात नवोदितांना अधिकाधिक संधी देण्याचा निवडसमितीचा निर्णय योग्य होता. त्यात अनेक क्रिकेटपटू विशेषत: फिरकी गोलंदाजांनी संधीचे सोने केले. त्यांना आणखी एक संधी म्हणून ऑस्ट्रेलियासारख्या मजबूत फलंदाजी असलेल्या संघाविरुद्ध खेळवले जातेय. त्यामुळे अश्विनला विश्रांती दिली, हे पटत नाही. निवडसमितीने नवोदित (फिरकी) गोलंदाजांना आणखी संधी दिली, हे नक्की,’’ असे लक्ष्मणने सांगितले.
कोहली हा स्मिथपेक्षा चांगला फलंदाज: क्लार्क
नवी दिल्ली – भारताचा कर्णधार विराट कोहली हा वनडे प्रकारात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथपेक्षा चांगला फलंदाज असल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने म्हटले आहे. ‘‘झटपट क्रिकेटमध्ये विराट हा स्टीव्हनपेक्षा सरस फलंदाज आहे. मात्र कसोटीमध्ये स्थिमने वरचष्मा राखला आहे. कोहलीने कर्णधारपदाची धुरा यशस्वीपणे पेलताना वैयक्तिक कामगिरीतही सातत्य राखले आहे. दोघांच्याही चांगल्या फॉर्ममुळे भविष्यात कोहली विरुद्ध स्मिथ अशी चर्चा रंगेल. मात्र वैयक्तिक कामगिरीच्या बळावर सातत्याने जिंकता येत नाही. चांगली सांघिक कामगिरी करणारा संघच जिंकतो,’’ असे क्लार्क म्हणाला. मागील काही महिन्यांतील कामगिरी पाहता वनडे प्रकारात भारताची कामगिरी उंचावल्याचे क्लार्कने मान्य केले आहे.
‘‘भारताने इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी चँपियन्स ट्रॉफीमध्ये उपविजेतेपद मिळवले. त्यानंतर श्रीलंकेला वनडेमध्ये ५-० असे हरवले. ऑस्ट्रेलियाला चँपियन्स ट्रॉफीमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यातच भारताला भारतात हरवणे, सोपे नसल्याने स्मिथ आणि कंपनीचा कस लागेल,’’ असे क्लार्कने म्हटले. विराट कोहली आणि सहकारी फॉर्मात असले तरी पाहुणे ३-२ अशा फरकाने बाजी मारतील, असे माजी कर्णधाराला वाटते.