ही अगदी मागच्या जूनमधली गोष्ट. तेव्हाच मला सातवा महिना लागला होता. मला सातवा महिना लागल्याबरोबर डोहाळे जेवण करायचं ठरवलं होतं. तारीख ठरली. सासर-माहेरची आणि आजूबाजूची मिळून साधारण पंचवीस-तीस माणसं बोलावली होती. सगळं छान ठरल्याप्रमाणे झालं होतं.
त्या दिवशीचा मेन्यूदेखील अगदी खास होता. व्हेज आणि नॉन व्हेज असा दोन प्रकारचा मेन्यू ठरवला होता. नॉनव्हेजमध्ये चिकन आणि मटण तर व्हेजमध्ये डाळ-भात-भाजी-पोळी असा मेन्यू केला होता.
माझ्या आवडीची मिक्स भाजी होती. आमच्याकडे देखील लग्नातला शालूच नेसायची प्रथा आहे. त्यामुळे लग्नातला जांभळ्या रंगाचा डिझायनर शालू मी नेसला होता. आईनेही मला हिरव्या रंगाची काठाची आणि वर्क केलेली अशी साडी आणली होती.
आमच्याकडे झोपाळा आणणं शक्य नव्हतं. मग माझ्या मिस्टरांनी एका टेबलला मोग-याचा गजरा लावून त्याचा छान झोपाळा तयार केला होता. अगदी बागेतला खराखुरा भासत होता आणि त्या मोग-याच्या सुगंधाने सगळं वातावरण कसं प्रसन्न झालं होतं.
सगळी तयारी झाली होती. पण जून महिना म्हणजे पावसाचा महिना. त्यामुळे आमच्या ठरलेल्या कार्यक्रमावर विरजण पडेल की काय असं वाटायला लागलं. कारण जून महिना असला तरी त्या दिवशी भरपूर पाऊस पडला होता. दादर, हिंदमाता सगळे रस्ते पाण्याने भरत असल्याच्या बातम्या कानावर येत होत्या.
माझं सासर वाशी गावात चेंबूरला. त्यामुळे माझ्या माहेरच्या मंडळींना सायनहून माझ्या सासरी चेंबूरला यायला जरा त्रासच झाला. काही नातेवाईक मात्र त्यांना यायचं असूनही येऊ शकले नाहीत. डोहाळजेवणाला फुलांची वाडी भरली जाते. फुलांची असल्यामुळे ती ताजीच आणावी लागते.
म्हणूनच संध्याकाळी आणायची असं ठरलं होतं. ती आणायला जाताना या पावसामुळे खूप हाल झाले. कारण ती खराब होऊ नये म्हणून काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं होतं. शेवटी कशीबशी कसरत करत माझ्या नव-याने तो फुलांनी भरलेला धनुष्य, परडी आणली. तेव्हा कुठे सगळ्यांच्या जीवात जीव आला.
त्यानंतर अतिशय पारंपरिक पद्धतीने माझ्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम पार पडला. गोडामध्ये मिठाई ठेवण्यात आली होती. पण ती केवळ ताटातली वाटी उघडण्याइतकीच मर्यादित होती.
मीदेखील बर्फीची वाटी उघडली. आणि मला तीन महिन्यांनी एक छान गोंडस मुलगी झाली तिचं नाव मी रिया असं ठेवलं आहे. माझ्या या डोहाळजेवणाचा पावसामुळे विचका होणार की काय असं वाटत होतं, मात्र माझ्या मिस्टरांनी काहीही न बोलता प्रचंड धडपड केली. माझी सगळी हौस पूर्ण केली. त्यामुळे या कार्यक्रमाचा विचका नाही तर हा कार्यक्रम सगळ्यांच्याच कायम लक्षात राहिला.