देशातील ८० कोटी जनतेला स्वस्त दरात अन्नधान्यांचा पुरवठा करण्याची हमी देणारे महत्त्वाकांक्षी अन्न सुरक्षा विधेयक सोमवारी लोकसभेत बहुमताने मंजूर झाले.
नवी दिल्ली- देशातील ८० कोटी जनतेला स्वस्त दरात अन्नधान्यांचा पुरवठा करण्याची हमी देणारे संयुक्त पुरोगामी आघाडीचे महत्त्वाकांक्षी अन्न सुरक्षा विधेयक सोमवारी लोकसभेत अखेर बहुमताने मंजूर झाले.
या विधेयकाअंतर्गत नागरिकांना तांदूळ तीन रूपये प्रतिकिलो, गहू दोन रूपये प्रतिकिलो आणि बाजरी एक रूपया प्रतिकिलो मिळणार आहे. शहरातील ५० टक्के नागरिकांना तर गावांमधील ७५ टक्के नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेसाठी १.२५ लाख कोटी रूपये खर्च होणार असून ६.१२ कोटी टन धान्याची आवश्यकता आहे.
या विधेयकावर लोकसभेत दुपारी दोन वाजता चर्चेला सुरुवात झाली. त्यानंतर तब्बल नऊ तास या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर विधेयक मंजूर करण्यात आले. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ही या विधेयकाला अखेर पाठिंबा दिला.
हे विधेयक गुरुवारी राज्यसभेत सादर केले जाण्याची शक्यता आहे.
– विधेयकामध्ये सरकारकडून ११ सुधारणा
– गुरूदास दासगुप्ता यांच्या तीन सुधारणा फेटाळल्या
– सुषमा स्वराज यांचा सुधारणा प्रस्ताव फेटाळला
– समाजवादी पक्षाने आपले प्रस्ताव मागे घेतले
– द्रमुकनेही प्रस्ताव मागे घेतले
– जदयू आणि राजदचा विधेयकाला पाठिंबा
– सपचा विरोध नाही, मात्र काही मुद्दयांवर आक्षेप