मध्य रेल्वे प्रशासनाने मात्र परस्परविरोधी भूमिका घेत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी प्रवाशांच्याच खिशावर डल्ला मारण्याची योजना आखली आहे.
मुंबई- दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक सरकारी अधिकारी आणि कर्मचा-यांकडून एक दिवसाचे वेतन दिले जात असताना मध्य रेल्वे प्रशासनाने मात्र परस्परविरोधी भूमिका घेत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी प्रवाशांच्याच खिशावर डल्ला मारण्याची योजना आखली आहे.
याकरता हार्बर मार्गावरील ४० वर्षे जुन्या डीसी लोकलच्या शेवटच्या प्रवासाठी तब्बल १० हजार रुपयांचे तिकीट दर आकारण्याची शक्कल लढवली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या या भूमिकेवर सडकून टीका केली जात असून ही तर ऐतिहासिक प्रवासाच्या नावाखाली व्यावसायिकरण करून प्रवाशांची लूट असल्याची भावना प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे.
हार्बर मार्गावरील देशातील सर्वात अखेरच्या टप्प्यातील डीसी-एसी परिवर्तन अखेर मार्गी लागत असल्याने कुर्ला येथून रात्री साडेअकरा वाजता शेवटची लोकल सीएसटी करता रवाना होईल. ही लोकल रात्री सव्वाबारा वाजता सीएसटी स्थानकात दाखल होणार आहे.
या गाडीतील तीन डब्यांसाठी रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे. या डब्यातील प्रत्येक आसनाचे तिकीट १० हजार रुपये आकारण्यात आले आहे. या प्रवाशांची रेल्वेकडून खातिरदारी केली जाणार असून सीएसटी स्थानकातील स्टार दालनात या प्रवाशांना नेण्यात येईल.
या दालनात प्रवाशांना डीसी-एसी परिवर्तनाचे करण्यात आलेले काम व्हीडिओ चित्रीकरणाद्वारे दाखवले जाणार आहे. त्यानंतर पहिल्या एसी लोकलला याच प्रवाशांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. शिवाय शेवटच्या फेरीत मनोरंजन क्षेत्रातील काही व्यक्ती या लोकलने प्रवास करण्याची शक्यता आहे.
६० हजार रुपयांचा पुतळा या गाडीचे डबे वाडीबंदर, पी. डीमेलो रोड आणि दिल्लीतील राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय येथे स्मारक म्हणून ठेवण्यात येतील. १० हजार रुपये भरून प्रवास केलेले प्रवासी तब्बल ६० हजार रुपये भरून जेजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून स्वत:चा पुतळा बनवून घेऊ शकतात.
हा पुतळा या डब्यांसह जतन करण्याची अजब संकल्पना मध्य रेल्वेने आखली आहे. या माध्यमातून मिळालेला निधी दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी दिली.
ऐतिहासिक निर्णयाचे रेल्वेने व्यावसायिकरण करून प्रवाशांची लूट करू नये. दुष्काळग्रस्तांसाठी रेल्वे अधिका-यांनी किती निधी दिला? त्यामुळे खरोखर रेल्वेला चिंता असेल तर मध्य रेल्वेच्या अधिका-यांनी त्यांचा एक महिन्याचा पगार दुष्काळग्रस्तांना द्यावा. त्यानंतर मुंबईतील सर्व प्रवाशांच्या तिकिटामागे १ रुपया आणि पासकरता १० रुपये अधिभार देण्यासही तयार आहोत. हा निधी दुष्काळग्रस्तांसाठी द्यावा. मध्य रेल्वेने हा उत्सव साजरा करावा, प्रवाशांना सामील करून घ्यावे; मात्र प्रवाशांची लूट करू नये.
– सुभाष गुप्ता, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे यात्री संघ