सणासुदीच्या काळात प्रवाशांचा विचार करुन संप मागे घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे.
मुंबई- वेतनवाढीच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचा-यांचा संप चुकीचा आहे, संप मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा एसटीचे व्यवस्थापकीय संचालकांनी दिला आहे. तर कामगारांचा संप बेकायदेशीर असून काँग्रेसचे छाजेड नावाचे नेते कामगारांची दिशाभूल करत आहेत. एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत सरकार सहानुभूतीने विचार करीत आहे. मात्र सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी मान्य करणे शक्य नाही. राज्य सरकारच्या कर्मचा-यांनाही सातवा आयोग लागू करणे शक्य नसल्याचा निर्वाळा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी दिला आहे. अशा परिस्थितीत परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग कसा लागू करणार, असा सवाल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी उपस्थित केला आहे.
सणासुदीच्या काळात कर्मचा-यांनी प्रवाशांना वेठीस धरू नये. प्रवासीच आपले अन्नदाता आहेत. त्यांचा विचार करावा. हा संप कामगारांच्या हिताचा नाही. याने कामगारांचेच नुकसान होणार आहे. प्रवाशांचा विचार करुन संप मागे घ्यावा, असे आवाहन रावते यांनी केले.
कामगार न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयाने संप चुकीचा ठरवला आहे, त्यामुळे संप मागे न घेतल्यास न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई होईल, अशी माहिती एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंग देओल यांनी दिली.
त्याचप्रमाणे परिवाहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले की, सातव्या वेतनसाठी सरकारकडे पैसे नाहीत, पुढील २५ वर्षे सातवा वेतन आयोग लागू करणे अशक्य आहे.
एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे ऐन सनासुदीत राज्यभर एसटी सेवा बंद झाल्याने राज्यभरात प्रवाशांचे हाल झाले आहेत. सातवा वेतन आयोग लागू करावा, वेतन वाढ करावी आदींसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील कर्मचारी संपावर गेले आहेत. औद्योगिक न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवला असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले. एसटी महामंडळाची आर्थिक ताकद कमी असून किमान २५ वर्ष तरी एसटी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लावता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. एसटी कायम तोट्यात असते. तरीदेखील एसटी कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यासोबत चर्चा घडवून आणली. एसटी कर्मचा-यांच्या पगारवाढी संदर्भात करार करण्यासाठी प्रशासन आग्रही आहे. मात्र, कामगार संघटना सातव्या वेतन आयोगाच्या मागणीवर ठाम असल्यामुळे करार झाला नसल्याचा आरोप दिवाकर रावते यांनी केला. काँग्रेसचे पदाधिकारी असलेले छाजेड यांच्या मागे कामगार संघटना धावत असल्याचा आरोपही रावते यांनी केला. काँग्रेसला या सरकारला अपशकुन करायचे असल्यामुळे हा संप झाला असल्याचे रावते यांनी सांगितले.
दरम्यान, दिवाकर रावतेंचे विधान उद्विग्नतेतून आणि विनोदातून आले आहे, अशी प्रतिक्रिया इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिली आहे. लोकांचे आज जे हाल होत आहेत, त्याची संपूर्ण जबाबदारी दिवाकर रावते आणि राज्य सरकारची आहे. आम्ही हौसेने संप केलेला नाही, वाटाघाटीसाठी आमचे दरवाजे उघडे आहेत, असेही छाजेड म्हणाले.
राज्यभर प्रवाशांचे हाल, संपाला हिंसक वळण
कोल्हापूरात या संपाला हिंसक वळण लागले. कागल बसस्थानकात पुणे-बेळगाव एसटीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. तर बीडमधील अंबेजोगाईत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
ऐन सनासुदीत दिवाळीसाठी गावी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे तर सर्वाधिक हाल झाले. ऐन दिवाळीत संप होणार नाही, रात्रीत काही तोडगा निघेल अशी प्रवाशांची अपेक्षा होती. त्यामुळे पहाटे निघणा-या गाड्या पकडण्यासाठी काही जण आले होते. मात्र त्यांना रखडत बसावे लागले. इतर वेळी एस टी स्टँडच्या आवारात अनेक खासगी गाड्या प्रवाशांना आवाहन करत असतात. मात्र संपाच्या भीतीमुळे आज खासगी गाड्याही नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.