एमपीएससी परीक्षांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या परीक्षार्थीची वयोमर्यादा २८ वरून ४० करण्यात यावी, अशी मागणी ‘स्वाभिमान संघटने’चे अध्यक्ष, आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
मुंबई – एमपीएससी परीक्षांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या परीक्षार्थीची वयोमर्यादा २८ वरून ४० करण्यात यावी, अशी मागणी ‘स्वाभिमान संघटने’चे अध्यक्ष, आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यावर काहीच तोडगा न काढल्याने खुल्या प्रवर्गातील लाखो उमेदवारांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘स्वाभिमान संघटने’तर्फे राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला लाखो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
राज्याचे युवा नेते आणि आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली लाखो लोकांनी स्वाक्षरी केलेले फलक हातात घेऊन मंगळवार २ फेब्रुवारी रोजी परीक्षार्थी विद्यार्थी तसेच ‘स्वाभिमान संघटने’च्या कार्यकर्त्यांनी मुंबईत मंत्रालयाजवळ मानवी साखळी करून आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी दिलेले आश्वासन पाळून वयोमर्यादेत लवकरात लवकर वाढ करावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा नितेश राणे यांनी या वेळी दिला.
एमपीएससीअंतर्गत होणा-या स्पर्धा परीक्षांमध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे होणारे नुकसान टळावे आणि त्यांनाही न्याय्य हक्क मिळावा यासाठी या प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा २८ वरून ४० वर्षे करण्यात यावी याबाबत मुख्यमंत्र्यांना गेल्या वर्षी ८ डिसेंबर रोजी नितेश राणे यांनी निवेदन दिले होते. तसेच नागपूर येथे हिवाळी अधिवेशनातही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी या मुद्दय़ाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र फेब्रुवारीचा पहिला आठवडा उजाडला तरी याबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतला नसल्याने या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमान संघटनेतर्फे राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. शासनातर्फे घेण्यात येणा-या एमपीएससी परीक्षांमध्ये खुल्या प्रवर्गातून पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा देण्यासाठी सध्या २८ वर्षे वयोमर्यादा आहे. तर इतर परीक्षेसाठी ही मर्यादा ३३पर्यंत आहे. राखीव प्रवर्गासाठी ही वयोमर्यादा ३८ आहे. या परीक्षेसाठी राज्यातील खुल्या वर्गातील लाखो विद्यार्थी प्रयत्न करतात. मात्र वयाच्या मर्यादेमुळे त्यांच्यावर अन्याय होतो, असे मत नितेश राणे यांनी व्यक्त केले होते. ही मर्यादा वाढवली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.