जनजागृतीमुळे एड्सबाधितांचे प्रमाण मागील काही वर्षाच्या तुलनेत कमी होऊ लागले आहे. मात्र अद्याप रुग्णांची संख्या पूर्णत: कमी झालेली नाही.
मुंबई- जनजागृतीमुळे एड्सबाधितांचे प्रमाण मागील काही वर्षाच्या तुलनेत कमी होऊ लागले आहे. मात्र अद्याप रुग्णांची संख्या पूर्णत: कमी झालेली नाही. यासाठी ‘जागतिक एड्सविरोधी दिना’चे औचित्य साधून वडाळा बस डेपोमध्ये ‘चला शून्याकडे’ मोहीम मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेद्वारे राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत येत्या ‘२०३०’ पर्यंत एड्सबाधितांची संख्या शून्य गाठणार! असा संकल्प सोडण्यात आला आहे.
एचआयव्ही रोखण्यासाठी एड्स नियंत्रण संस्थेच्या माध्यमातून जनजागृती, प्रतिबंधात्मक उपचार राबवण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईत दरवर्षी नवीन रुग्णांत ५० टक्के घट झाली आहे. गर्भवती मातांतही एचआयव्ही संसर्गाच्या प्रमाणात ५७ टक्के घट झाली आहे. एड्समुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण शून्य करणे हेच आपले लक्ष्य असणार आहे, असा विश्वास मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या प्रकल्प संचालक डॉ. श्रीकला आचार्य यांनी व्यक्त केले.
भारतात एड्सचा पहिला रुग्ण मुंबईत १९८६ साली आढळून आला. तेव्हापासून एड्स नियंत्रणासाठी ही संस्था सतत कार्यरत आहे. मुंबईतील सर्व रुग्णालयांतून सुरक्षित रक्त पुरवठा करणे, सुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्याबाबत, एड्सची लागण होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या समाज घटकांत जनजागृती निर्माण करण्यासाठी एड्स नियंत्रण संस्था कार्यरत आहे.
याशिवाय पालिका रुग्णालये तसेच १४ एआरटी केंद्रात ‘एचआयव्ही’ची तपासणी करण्यात येते. व्यक्तीला संशय वाटल्यास त्याने तातडीने तपासणी करून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून या आजाराचा प्रसार होणार नाही. एड्सवर आळा घालण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपली काळजी स्वत: घेतली पाहिजे, असे मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या प्रकल्प अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी म्हटले आहे.
मागील दहा वर्षापासून एड्स नियंत्रण संस्था समाजातील लोकांत एचआयव्हीबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच एचआयव्हीबाधितांची संख्या कमी झाली आहे. २००५ पासून बेस्ट प्रशासन या संस्थेसोबत काम करत आहे. त्यामुळे यंदा ‘बेस्ट’च्या बसेसवर एचआयव्हीबाबत संदेश देणारे फलक लावून जनजागृती केली जात आहे. एचआयव्ही मुक्तीसाठी सर्वानी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे.
– सुनील गणाचार्य, बेस्ट समिती सदस्य