जगातील सर्वात जास्त अन्न धान्य उत्पादन करणा-या भारतात गेल्या आठ वर्षात एक लाख ९४ हजार ५०२ मेट्रिक टन अन्न धान्याची नासाडी झाल्याचे समोर आले आहे.
ठाणे- जगातील सर्वात जास्त अन्न धान्य उत्पादन करणा-या भारतात गेल्या आठ वर्षात एक लाख ९४ हजार ५०२ मेट्रिक टन अन्न धान्याची नासाडी झाल्याचे समोर आले आहे. माहितीच्या अधिकाराखाली मिळवण्यात आलेल्या माहितीच्या ही आकडेवारी मिळाली आहे.
ठाण्यातील आरटीआय कार्यकर्ते ओम प्रकाश शर्मा यांनी भारतीय अन्न महामंडळाकडे यासंदर्भात विचारणा केली होती. ‘एफसीआय’ने दिलेल्या माहीतीनुसार २००५ ते २०१३ या वर्षात विविध कारणांमुळे अन्न धान्यांची नासाडी झाली आहे.
‘एफसीआय’ने दिलेल्या माहीतीनुसार २००५-०६ या वर्षात ९५ हजार ७५ मेट्रिक टन, २००६-०७मध्ये २५ हजार ३५३ मेट्रिक टन, २००७-०८मध्ये चार हजार ४२६ मेट्रिक टन , २००८-०९मध्ये २० हजार ११४ मेट्रिक टन अन्न धान्याची नासाडी झाली होती.
या आठ वर्षात नासाडी झालेल्या अन्न धान्यामध्ये तांदळाचे प्रमाण ८४ टक्के इतके होते. तर गव्हाचे प्रमाण १४ टक्के होते.
देशातील २३ विभागातील अन्न धान्याच्या नासाडीची माहिती ‘एफसीआय’ने दिली आहे. सर्वाधिक अन्न धान्याची नासाडी पंजाबमध्ये झाली आहे. या राज्यात ९८ हजार २०० मेट्रिक टन इतकी नासाडी झाली आहे. तर महाराष्ट्रात २० हजार ६७ मेट्रिक टन अन्न धान्याची नासाडी झाल्याची माहीती ‘एफसीआय’ने दिली आहे.
देशात अनेक जणांचा मृत्यू उपासमारीमुळे होतो. अशा वेळी अन्न धान्याची नासाडी होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे शर्मा यांनी सांगितले. तसेच या नासाडीला जबाबदार असणा-या व्यक्तींना शिक्षा झाली पाहिजे असेही ते म्हणाले.