विधानसभा निवडणुकीचा सोमवारी सायंकाळी पाच वाजता प्रचार बंद होईल. निवडणूक जिंकण्याची बाकी सर्व तंत्रे पुढच्या २४ तासांतच सुरू होतील. अगोदरचा महिनाभराचा प्रचार हा अलिकडे फारसा उपयोगी पडत नाही. गर्दीवरून अजिबात अंदाज बांधता येत नाही.
विधानसभा निवडणुकीचा सोमवारी सायंकाळी पाच वाजता प्रचार बंद होईल. निवडणूक जिंकण्याची बाकी सर्व तंत्रे पुढच्या २४ तासांतच सुरू होतील. अगोदरचा महिनाभराचा प्रचार हा अलिकडे फारसा उपयोगी पडत नाही. गर्दीवरून अजिबात अंदाज बांधता येत नाही.
भाषणांमुळे मतदारांचे विचार बदलतात, हेही आता फार शक्य नाही. ज्यांच्याकरता मतदारांनी वाट पाहत बसावी, असा एकही वक्ता आज एकाही पक्षाकडे नाही. मोदी नाटकी आहेत, हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा त्यांनी घालवलीच, गल्लीबोळात ते फिरू लागले. बाजूला सगळे चॅनेलवाले जमा करून ठेवलेले आहेत. ‘लुक’सारख्या ज्या मासिकाचा ग्रामीण जीवनाशी कवडीचा संबंध नाही, त्या ‘लुक’नेही भाजपाला १५४ जागा देऊन टाकल्या. १९ तारखेपर्यंत ज्यांना जसे हवे तसे वाटप करावे. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि ही लोकशाहीची देन काँग्रेसनेच दिलेली आहे. पण, ही निवडणूक जेव्हा जाहीर झाली, तेव्हा काँग्रेसबद्दलचे जे चित्र मांडले जात होते, तशी स्थिती आता अखेरच्या टप्प्यात राहिलेली नाही. अशी विश्लेषणे धुरंदर राजकीय विश्लेषक करू लागले आहेत. घोडा-मैदान जवळ आहे.
सामान्यपणे एक गोष्ट मान्य केली जात आहे की, जे भाजपचे कैवारी आहेत, तेही १५४ हा आकडा सांगायला धजावत नाहीत. खरी गोष्ट अशी आहे की, पूर्ण बहुमत कोणालाच मिळणार नाही. २८८ या आकडय़ामध्ये पाच वाटे पडतील. जे असं समजत आहेत की, भाजप १५४, त्याचा दुसरा अर्थ बाकी सगळे १४३ मध्ये. महाराष्ट्राचे आजचे राजकीय चित्र पाहिले, तर कोणत्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळेल अशी स्थिती नाही. पण, काँग्रेस एकदम खाली गडगडेल, असेही नाही. उलट गेल्या निवडणुकीत काँगेसला ८२ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस ७०-८०पर्यंत पोहोचेल.
१९९९ साली जूनमध्ये राष्ट्रवादीचा जन्म झाला. विधानसभा निवडणुका लगेच ऑक्टोबरमध्ये झाल्या. त्या निवडणुकीत आतासारखी स्थिती होती. काँग्रेस स्वतंत्रपणे लढली, राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेली. निवडणुकीनंतर हे दोन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सत्ता मिळवली. त्या वेळी काँग्रेसला ७५ जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादीला ५८ जागा मिळाल्या. काही अपक्षांना बरोबर घेऊन सरकार बनले. २००४ साली काँग्रेस स्वतंत्रपणे लढली नाही. राष्ट्रवादीसोबत आघाडी झाली. तेव्हा काँग्रेसला ६९ आणि राष्ट्रवादीला ७१ जागा मिळाल्या. २००९ सालीही आघाडी ठेवली गेली. तेव्हा काँग्रेसला ८२ जागा आणि राष्ट्रवादीला ६२ जागा मिळाल्या.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील काँग्रेसचे सरकार गेले. त्यामुळे राष्ट्रवादीवाले काँग्रेससोबत राहणार नव्हतेच. जिथे सत्ता तिथे राष्ट्रवादी त्यामुळे त्यांनी आघाडी तोडली. पण, जे होते ते चांगल्याकरता होते. दोन्ही पक्षातल्या काही पुढाऱ्यांना आघाडी हवी होती. ती त्यांच्या फायद्यासाठी हवी होती. पण, काँगेसच्या सामान्य कार्यकर्त्यांला राष्ट्रवादीबरोबर आघाडी अजिबात पटलेली नव्हती. २००४ आणि २००९च्या निवडणुकीत नाईलाजाने काँग्रेसच्या गावागावातील कार्यकर्त्यांनी आघाडी मान्य केली. राष्ट्रवादीने वरून आघाडीचे नाटक केले. पण, तिथे अपक्ष उमेदवार उभा करून काँग्रेसला पाडायचे धंदे २००४ तसेच २००९मध्ये झाले. तरी काँग्रेस क्रमांक एकवरच राहिली. आताही पाच वर्षात राष्ट्रवादी किती बदनाम झाली आहे आणि शरद पवार यांचे राष्ट्रवादी पक्षावरील नियंत्रण कसे ढिले पडले आहे, याचा प्रत्यय येईल. शरद पवार यांचे राजकीय मोठेपण वादातीत आहे. पण, ते जसेच्या तसे अजित पवार यांना लागू होत नाही. शरद पवार यांना न जुमानणारा एक तरुण वर्ग राष्ट्रवादीत अजित दादांच्या मागे उभा राहतो आहे. त्यात तटकरे आहेत, शशिकांत शिंदे आहेत आणि असे बरेच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची वाटचाल ही चुकीच्या पद्धतीने होत गेली. त्याचा फटका त्यांना बसेल. शरद पवार वजा केले तर राष्ट्रवादीजवळ नेतृत्वच नाही. त्याचाही प्रत्यय येणार आहे.
राष्ट्रवादीचे काय व्हायचे ते होवो, महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षात मात्र आघाडी तुटली याबद्दल दिवाळी साजरी झाली. निवडणुकीत काय व्हायचे ते होईल. अगदी गृहीत धरू या की काँग्रेस बहुमत मिळवू शकणार नाही. नाही मिळाले तरी हरकत नाही. पण, घुसमटून मरण्यापेक्षा लढून मरणे केव्हाही चांगले. राष्ट्रवादीच्या हातावर पाणी ओतून ढेकर देण्यापेक्षा उपाशी राहिले तरी पक्ष मोठा करता येईल. आघाडी तुटल्यामुळे ज्या ११९ मतदारसंघात राष्ट्रवादीला जागा सोडलेल्या होत्या. त्या ११९ मतदारसंघात १० वष्रे काँग्रेस मृतवत होती. ना तिथे काँग्रेसचे कार्यालय होते, ना तिथे काँग्रेसचा झेंडा होता, ना काँग्रेसचा पुढारी होता. सगळे काही राष्ट्रवादीच्या ताब्यात दिले होते. आघाडी तुटल्याचा सगळ्यात मोठा फायदा महाराष्ट्रात काँग्रेस पुन्हा एकदा जोरदारपणे जिवंत झाली. ग्रामीण भागातला सामान्यतला सामान्य कार्यकर्ता मुक्त झाला.
खांद्यावर काँग्रेसचा झेंडा घेऊन जल्लोषात उभा राहिला. जे मतदारसंघ आता मुक्त झाले आहेत, त्या मतदारसंघातील सभांकडे नजर टाकली तर महाराष्ट्रातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांला आघाडी तुटल्यामुळे संजीवनी मिळालेली आहे. शुक्रवारी माढा मतदारसंघात टेंभुर्णीला गेलो होतो. काँग्रेसचे तरुण उमेदवार कल्याण काळे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. २० वर्षे आमदार असलेले (त्यापैकी एक टर्म काँग्रेस आणि तीन टर्म राष्ट्रवादी) बबनदादा िशदे यांच्या दादागिरीविरुद्ध जो प्रचंड संताप आणि उत्साह दिसत होता, त्यामुळे ही गोष्ट जाणवत होती की, आघाडी तुटली याचा सामान्य कार्यकर्त्यांला आनंद आहे. काँग्रेसला किती जागा मिळतात यापेक्षा सुद्धा काँग्रेस मुक्त झाली, काँग्रेसच्या डोक्यावरचे ओझे उतरले.
काँग्रेस सरकारच्या जीवावर गडगंज कमवून घेतलेल्या पक्षाने आता निवडणुकीनंतर कोणाबरोबरही जायची तयारी ठेवलेली आहे. पण, महाराष्ट्राच्या निवडणूक निकालासंदर्भात बाकी काही भविष्य करता आले नाही तरी, कोण क्रमांक एकवर राहील, याचे भविष्य न करणारेही एक गोष्टीचे भविष्य जाहीरपणे सांगत आहेत की राष्ट्रवादी शेवटच्या क्रमांकावर राहील. १४ वर्षाच्या सत्तेत राष्ट्रवादीने काय मिळवले आणि शरद पवारसाहेबांनी महाराष्ट्रात जे मिळवले होते, ते या टोळीने कसे घालवले, त्याचाही निकाल याच निवडणुकीत लागणार आहे. काँग्रेसला विजय मिळो, मिळो काँग्रेस लढायला मोकळी झाली, हा सगळ्यात मोठा विजय आहे. काँग्रेसचा झेंडा पुन्हा एकदा फडकत आहे. तरुणांनी आघाडी तुटण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.